शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केला असता, तर जास्त बरं वाटलं असतं, विनोद तावडेंचा टोला

| Updated on: Sep 25, 2020 | 2:18 PM

राज्य सरकारची नियत काय आहे, मराठा समाजाला कसे डावलायचे, हे या सरकारला माहित आहे, असा घणाघात विनोद तावडे यांनी केला

शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केला असता, तर जास्त बरं वाटलं असतं, विनोद तावडेंचा टोला
Follow us on

अहमदनगर : कृषी विधायकावरुन अन्नत्याग आंदोलन करणारे  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजप नेते आणि माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी निशाणा साधला. शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग आंदोलन केले असते, तर अधिक बरे वाटले असते, असा टोला तावडेंनी लगावला. (BJP Leader Vinod Tawade taunts Sharad Pawar on Hunger Strike)

“शरद पवार स्वतः कृषिमंत्री होते. त्यांना जर कृषी विधेयकामध्ये काही दुरुस्त्या सुचवायच्या असत्या, तर त्यांनी राज्यसभेत बोलणे गरजेचे होते, शेतकरी हिताच्या दुरुस्त्या नक्कीच सरकारने स्वीकारल्या असत्या. पण शरद पवार यांच्यासारख्या माजी कृषिमंत्री आणि ज्येष्ठ नेत्याने केवळ विरोधासाठी विरोध करणे सामान्य शेतकऱ्याला पटलेले नाही” असा घणाघात विनोद तावडेंनी केला. कृषीविषयक विधेयक नीट पाहिले तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची योजना मोदी सरकारने आणली, अशा शब्दात तावडेंनी स्तुतिसुमनं उधळली.

या सरकारची नियत काय आहे, मराठा समाजाला कसे डावलायचे, हे या सरकारला माहित आहे. शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केले असते, तर अधिक बरे वाटले असते, असा टोला तावडेंनी लगावला.

राज्यसभेत कृषीविधेयक मंजूर करताना राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंह यांनी केलेल्या वर्तनावर शरद पवारांनी संताप व्यक्त केला होता. राज्यसभेच्या उपाध्यक्षांचं वर्तन सदनाचं अवमूल्यन करणारं असल्याचं सांगत पवारांनी 22 सप्टेंबरला एक दिवसासाठी अन्नत्याग आंदोलन केलं होतं.

“एकनाथ खडसे नाराज नाहीत”

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोर धरत आहेत. यावर बोलताना, एकनाथ खडसे नाराज नाहीत, भाजप एकसंघ आहे, असे तावडे म्हणाले.

राज्यातल्या शिक्षण विभागाने फक्त शहरी विद्यार्थ्यांचा विचार केला. त्यांच्या आई-वडिलांकडे मोबाईल आहे, म्हणून ऑनलाईन शिक्षण सुरु केलं. मात्र दुर्दैवाने जो खेड्यातला आणि तांड्यावरचा विद्यार्थी आहे त्याच्या संदर्भात कोणताही निर्णय शासनाने घेतला नाही. महाराष्ट्र सरकारचा शिक्षण विभाग हा संस्थाचालकांच्या दबावात आहे, संस्थाचालकांना मोठ्या प्रमाणात फी गोळा करायची सवय झाली आहे, अशी टीकाही विनोद तावडे यांनी केली.