Who is Narayan Rane : कट्टर शिवसैनिक ते केंद्रीय मंत्री; वाचा, कशी आहे नारायण राणेंची राजकीय कारकिर्द?

| Updated on: Aug 24, 2021 | 5:13 PM

Who is Narayan Rane : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक झाली आहे. नारायण राणे यांनी कोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्याने नारायण राणे यांना अटक करण्यात आली.

Who is Narayan Rane : कट्टर शिवसैनिक ते केंद्रीय मंत्री; वाचा, कशी आहे नारायण राणेंची राजकीय कारकिर्द?
नारायण राणे, केंद्रीय मंत्री
Follow us on

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक झाली आहे. नारायण राणे यांनी कोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्याने नारायण राणे यांना अटक करण्यात आली. सध्याच्या घडीला शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेटपणे अंगावर घेणाऱ्या नेत्यांची नावे घ्यायची झाली तर त्यामध्ये नारायण राणे हे नाव अग्रस्थानी असेल. एकेकाळी कट्टर शिवसैनिक असणारे नारायण राणे काँग्रेस, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष असा प्रवास करुन आता भाजपमध्ये स्थिरावले आहेत. कट्टर शिवसैनिक, विधानसभेचे विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री आणि आता थेट केंद्रीय मंत्रीपद… नारायण राणे यांची राजकीय कारकिर्द अशी राहिली आहे. वादळी आणि आक्रमक नेतृत्व असलेल्या राणेंच्या कारकिर्दीवर टाकलेला हा प्रकाश. (MP Narayan Rane Political journey)

आजघडीला कोकणातील प्रमुख राजकीय नेत्यांमध्ये नारायण राणे आपले स्थान टिकवून आहेत. मध्यंतरी कोकणात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नारायण राणे यांनी आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवले होते. तेव्हापासून नारायण राणे हे भाजप नेतृत्त्वाच्या मर्जीत बसले आहेत. भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मध्यंतरी कणकवलीत नारायण राणे यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यामुळे नारायण राणे यांचे राजकीय वजन आणि विरोधकांवरील टीकेची धार आणखीनच वाढली आहे.

कोण आहेत नारायण राणे?

नारायण तातू राणे यांचा जन्म 20 एप्रिल 1952 रोजी कोकणात झाला. मोठा जनाधार असलेल्या कोकणातील नेत्यांमध्ये नारायण राणेंचा समावेश होतो. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. आक्रमक स्वभावाचे नारायण राणे शिवसेनेत वेगाने पायऱ्या चढत वर गेले. सुरुवातीला चेंबुरमध्ये शाखाप्रमुख असलेले राणे 1985 साली मुंबई महानगरापालिकेच्या बेस्ट समितीचे अध्यक्ष झाले. त्यानंतर 1990 साली कणकवली-मालवण मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार झाले. 1995 मध्ये युतीची सत्ता आल्यावर त्यांच्याकडे दुग्धव्यवसाय विकास, पशु संवर्धन, मत्स्यव्यवसाय, खार जमिनी, विशेष सहाय्य व पुनर्वसन, उद्योग या खात्यांचा कारभार सोपवण्यात आला.

1997 साली त्यांच्याकडे महसूल खाते सोपवण्यात आले. मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर 1998 ते 99 या काळात त्यांनी या पदाची धुरा सांभाळली. 2005 साली शिवसेना सोडून ते काँग्रेसमध्ये गेले. 2009मध्ये पुन्हा काँग्रेस आघाडी सत्तेत आल्यावर राणेंना उद्योग खातं मिळाले. त्यानंतर आता भाजपमध्ये आल्यानंतर नारायण राणे यांची राज्यसभेवर वर्णी लागली.

बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे यांना उत्तराधिकारी केलं अन्…

बाळासाहेब ठाकरे यांनी 2003 साली महाबळेश्वर येथील अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड केली. त्यावेळी नारायण राणे प्रचंड दुखावले गेले. उद्धव ठाकरे यांच्यामुळे आपली दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची संधी गेली, असे राणे यांनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केले आहे. 1999 मध्ये विरोधी पक्षनेते असलेल्या नारायण राणे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार पाडण्याच पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, त्याला उद्धव ठाकरे यांच्याकडून अपेक्षित साथ मिळाली नाही, असे नारायण राणे यांचे म्हणणे आहे.

याच काळात उद्धव ठाकरे यांनी सुभाष देसाई आणि मनोहर जोशी यांना हाताशी धरुन नारायण राणे यांना विरोधी पक्षनेतेपदावरून दूर करण्याच्या हालचाली सुरु केल्या. त्यामुळे नारायण राणे यांची शिवसेनेत घुसमट होऊ लागली. अखेर 2005 साली नारायण राणे हे आपल्या समर्थकांसह शिवसेनेतून बाहेर पडले.

शेवटी तुम्ही सुद्धा ठाकरेच, नारायण राणेंनी राज ठाकरेंचा प्रस्ताव नाकारला

नारायण राणे यांनी आपल्या आत्मचरित्रात राज ठाकरे यांच्याबाबतचा एक किस्सा नमूद केला आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे एकदा राज ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले होते. त्याचवेळी राज ठाकरे यांनीही आपणही शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या विचारात असल्याचे सांगितले.

त्यावेळी राज ठाकरे यांनी आपण दोघांनी मिळून एक पक्ष काढू, असा प्रस्ताव नारायण राणे यांच्यासमोर मांडला. या प्रसंगाबद्दल सांगताना नारायण राणे यांनी लिहले आहे की, हे ऐकायला फार छान वाटत असलं तरी मला पाय जमिनीवर ठेवणं भाग होतं. मी त्यांना म्हणालो, राज, मी एका ठाकरेंबरोबर सर्वस्व झोकून काम केलेलं आहे. ठाकरे कुटुंबात काम कसं चालतं, हे मला चांगलं माहिती आहे. पुन्हा तसा अनुभव घेण्याची माझी तयारी आहे, असं मला वाटत नाही. काही झालं तरी शेवटी बोलूनचालून तुम्ही ठाकरेच, असं बोलून नारायण राणे तिथून बाहेर पडले.

मुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षेमुळे काँग्रेसमध्ये असमाधानी

काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर नारायण राणे स्वस्थ नव्हते. राणेंची महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्रिपदाची होती. यातूनच ज्या विलासराव देशमुखांनी त्यांना काँग्रेसमध्ये आणलं त्यांच्याचविरोधात राणेंनी आघाडी उघडली. 2009मध्ये पुन्हा काँग्रेस आघाडी सत्तेत आल्यावर राणेंना उद्योग खातं मिळालं. याच दरम्यान सोनिया गांधी, अहमद पटेल, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करून राणेंनी हायकमांडची खप्पामर्जी ओढावून घेतली.

(BJP MP Narayan Rane Political journey)