‘एकनाथ शिंदे यांचं उद्धव ठाकरेंसोबत मोठं डील, मुख्यमंत्र्यांनी मुलासाठी ठाणे सोडलं?’, भाजपच्या संतप्त पदाधिकाऱ्याचा आरोप
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडून नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप पदाधिकारी संतापले आहेत. भाजपच्या 539 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. तसेच यापैकी एका पदाधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. महायुतीत गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे लोकसभा मतदारसंघाचा पेच निर्माण झाला होता. कारण शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचा या जागेवर दावा होता. अखेर शिवसेनेकडून अधिकृतपणे ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेकडून ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी तिथले विद्यमान खासदार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांना श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीबाबत तक्रार नाही. पण ठाण्याचा जागेवर भाजप पदाधिकारी चांगलेच संतापले आहेत. नवी मुंबईतील तब्बल 65 माजी नगरसेवरांनी राजीनामे दिले आहेत. तसेच एकूण 539 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या पदाधिकाऱ्यांची प्रसारमाध्यमांसमोर भूमिका मांडणाऱ्या पदाधिकाऱ्याने प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांचा खळबळजनक दावा नेमका काय?
“आमच्या भाजपच्या वतीने अनेक बैठका होत असताना आम्हाला सांगण्यात आलं की, कोणत्याही परिस्थितीत भाजप पक्षाला ठाणे लोकसभा मतदारसंघ हा सोडण्यात येईल, भाजपच्या वतीने एकमेव उमेदवार इच्छुक होते ते म्हणजे संजीव नाईक. दुसरा कुठलाही उमेदवार इच्छुक नव्हता. आम्ही सर्व खात्रीशीर होतो. पण काल सकाळी बातमी येऊन धडकली. नरेश म्हस्के यांना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर झाली. ते भले महायुतीचे उमेदवार आहेत. पण ठाणे लोकसभा मतदारसंघात जे 4 विधानसभा मतदारसंघ हे भाजपच्या प्रभावाखाली आहेत. नवी मुंबईत साडे आठ लाख मतदार आहेत, मीरा भाईंदरमध्येदेखील भाजप कार्यकर्त्यांचा उद्रेक झालाय”, असं भाजप पदाधिकारी म्हणाला.
‘कल्याणच्या जागेसाठी ज्या वाटाघाटी…’
“तुमच्या दोन आमदाराच्या जीवावर साटेलोट्याचं राजकारण करत असताना मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं आहे, आम्ही आज महायुतीमधील घटक आहोत. पण त्यांच्या पुत्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कल्याणच्या जागेसाठी ज्या वाटाघाटी केलेल्या आहेत, उबाठा गटाने त्या ठिकाणी किरकोळ उमेदवार दिला, त्या ठिकाणी साटेलोटाचं राजकारण केलं. तिथे प्रचार न करता त्यांचा मुलगा निवडून आला पाहिजे. म्हणून त्याची परतपेड करण्यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली”, असा आरोप भाजप पदाधिकाऱ्याने केला. “नरेश म्हस्के नावाचा कार्यकर्ता, ते महापौर जरी असले तरी त्यांचं त्यांच्या वॉर्डाच्या बाहेर काहीच चालत नाही”, असंदेखील संबंधित कार्यकर्ता पुढे म्हणाला.
या आरोपांमुळे एकनाथ शिंदे यांचं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत कल्याणच्या जागेसाठी खरंच डील झालंय का? असा प्रश्न निर्माण झालाय. “आम्ही आज एवढंच सांगू इच्छितो, महायुतीबाबत काय निर्णय घ्यायचं ते आमचे नेते निर्णय घेतील. आज सकाळी नवी मुंबईच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक नवी मुंबईच्या व्हाईट हाऊसमध्ये झाली, सुरुवातीच्या कालखंडात जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, गणेश नाईक किंवा इच्छुक उमेदवार संजीव नाईक असतील, यांनी आपली भूमिका विशद केली. पण कार्यकर्त्यांचा भावनांचा उद्रेक झाला. आमची महापालिका 25 वर्षांपासून सातत्याने एक नंबरला येत आहे. ते सगळं असताना त्यांना डावलण्याची भूमिका ही जाणीवपूर्वक घेण्यात आल्याची भावना सगळ्यांची झाली आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं आहे की, आम्ही कशासाठी त्यांचा प्रचार करायचा? कशासाठी त्यांच्या चिन्हाचा वापर करायचा?”, असे सवाल भाजप पदाधिकाऱ्याने केले.