आढावा : राणे विरुद्ध सावंत, कणकवलीत कोण बाजी मारणार?

| Updated on: Oct 19, 2019 | 5:56 PM

संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना-भाजपची युती असताना कणकवलीत मात्र हे दोन्ही पक्ष आमने सामने आले आहेत. कणकवलीची जनता कोणाच्या बाजूने कौल देते, हे पाहण महत्त्वाचं ठरणार (Kankavli Vidhansabha Constituency) आहे.

आढावा : राणे विरुद्ध सावंत, कणकवलीत कोण बाजी मारणार?
Follow us on

सिंधुदुर्ग : कणकवली मतदारसंघात मोठी चुरस निर्माण झाली आहे. शिवसेना भाजप बरोबरच वंचित आघाडी ही तळकोकणात आपल नशीब आजमावत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना-भाजपची युती असताना कणकवलीत मात्र हे दोन्ही पक्ष आमने सामने आले आहेत. महाराष्ट्रात या दोन पक्षात होत असलेल्या एकमेव लढतीसाठी दोन्ही पक्षांचे दिग्गज प्रचारात उतरले होते. नुकतंच प्रचाराचा कालावधी संपला असून उमेदवारांनी प्रचारासाठी रात्रीचा दिवस केल्याचे चित्रही पाहायला मिळाले. अर्थातच कणकवलीची जनता कोणाच्या बाजूने कौल देते, हे पाहण महत्वाचं ठरणार (Kankavli Vidhansabha Constituency) आहे.

कणकवलीची निवडणूक म्हटली की, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागते. कणकवलीच्या निवडणुकीत नेहमीच राणे आणि शिवसेनेमधला संघर्ष पहायला मिळतो. येत्या निवडणुकीत 288 जागांपैकी 287 जागांवर शिवसेना भाजपची युती आहे. मात्र कणकवलीमध्ये हे दोन्ही पक्ष समोरासमोर उभे ठाकले आहेत. भाजपकडून विद्यमान आमदार नितेश राणे तर शिवसेनेकडून एकेकाळचे राणेचेचं कट्टर समर्थक सतीश सावंत मैदानात आहेत. युतीच्या अजेंड्यात ही जागा भाजपच्या वाट्याला आली असली तरी शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवसेनेच्या सुभाष देसाई, संजय राऊत ,विनायक राऊत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही या मतदारसंघात प्रचारसभा घेतल्या. उमेदवार सतीश सावंत तर रात्रीचा दिवस करत गाववार बैठका घेत आहेत. प्रचार करताना मिळालेल्या प्रतिसादामुळे आणि दिग्गजांच्या सभांमुळे सतीश सावंत यांना आपल्या विजयाची खात्री वाटत आहे.

कणकवलीची लढत प्रतिष्ठेची झाल्यामुळे राज्याचे लक्ष या लढतीकडे लागले आहे. भाजपच्या वाट्याला ही जागा येऊन ही सेनेने उमेदवार उभा केल्यामुळे भाजपने ही प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या विनोद तावड़े ,रविंद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, नारायण राणे यांनी ही या मतदारसंघात सभा घेतल्या आहेत. या दिग्गजांच्या सभांचा परिणाम विजयात होईलच. मात्र आपण केलेली 5 वर्षातील कामे, आपला संपर्क यामुळे कणकवलीतला विजय आपलाच असल्याचे नितेश राणे दावा करत आहेत. नितेश राणे यांच्या मदतीला नारायण राणे, भाऊ निलेश राणे, आई निलम राणे, पत्नी नंदिता राणे असे संपूर्ण राणे कुटुंब प्रचारात उतरलं आहे. नितेश राणे तर पहाटेपर्यंत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत असून तगड़ी मेहनत करत (Kankavli Vidhansabha Constituency) आहेत.

कणकवली मतदारसंघात 7 उमेदवार रिंगणात असून शिवसेना भाजप बरोबरच मनसे, वंचित आघाडी आणि काँग्रेस ही मैदानात उतरली आहे. त्यातील वंचित आघाडी प्रथमच तळकोकणातल्या राजकारणात उतरली असून या मतदारसंघात मराठा जातीचा महिला उमेदवार वंचित आघाडीने दिला आहे. पेशाने वकील असणाऱ्या मनाली वंजारे यांनी ही मतदारांच्या भेट घेण्यावर भर दिला आहे. तसेच बदल म्हणून लोक आपल्याला स्वीकारतील असा त्यांचा दावा आहे.

कणकवली मतदारसंघात 7 उमेदवार नशीब आजमावत असले, तरी खरी लढत ही शिवसेना आणि भाजपमध्येच आहे. प्रचार संपला असला तरी उमेदवारांसह कार्यकर्ते जागते रहो भूमिकेत असणार असून गुप्त प्रचारावर भर दिला जाणार आहे.