पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट, सागर बंगल्यावर 40 मिनिटं बैठक, मुद्दा काय?

त्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा लवकरच पार पडणार आहे. त्यामुळे फडणवीस आणि मुंडे यांच्यात काय चर्चा झाली, याचे आडाखे बांधले जात आहेत.

पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट, सागर बंगल्यावर 40 मिनिटं बैठक, मुद्दा काय?
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 09, 2022 | 1:59 PM

मुंबईः ऐन हिवाळ्यात महाराष्ट्राचं राजकारण (Maharashtra Politics) तापलं असताना आणखी एक घडामोड समोर आली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. फडणवीस (Devendra Fadanvis) आणि पंकजा मुंडे यांच्यात जवळपास 40 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्र सरकारचं हिवाळी अधिवेशन येत्या १९ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यापूर्वी राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यातच पंकजा मुंडे यांनी फडणवीस यांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.

शिंदे-भाजप महायुतीच्या नव्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला, तेव्हा पंकजा मुंडे यांच्या नावाची बरीच चर्चा होती. अनेक वर्षांपासून भाजपमध्ये डावलले गेल्याची खंत पंकजा मुंडे यांच्या मनात आहे.

सरकार स्थापन झाल्यावर भाजपकडून ही नाराजी दूर केली जाईल, अशी शक्यता होती. मात्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर तेही दिसून आलं नाही. पंकजा मुंडे यांच्या नाराज कार्यकर्त्यांनी अक्षरशः रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला होता.

त्यानंतर पंकजा मुंडे यांनी शांततेचं आवाहन केल्यानंतर ही चर्चा शांत झाली. आता मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा लवकरच पार पडणार आहे. त्यामुळे फडणवीस आणि मुंडे यांच्यात काय चर्चा झाली, याचे आडाखे बांधले जात आहेत.

पंकजा मुंडे सध्या राज्यातील राजकारणात फारशा सक्रिय नाहीत. त्यांना भाजपचे राष्ट्रीय सचिव पदावर कार्यरत आहेत. तसेच मध्य प्रदेश भाजपाच्या त्या प्रभारी आहेत. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमांमध्ये त्यांची हजेरी असते. मात्र राज्यात भाजपने पुढाकार घेतलेल्या कार्यक्रमात त्या दिसून येत नाहीत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापाठोपाठ अनेक भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. त्यातच कर्नाटक सीमाप्रश्नावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही आडमुठी भूमिका घेतली आहे.

केंद्रात भाजप सरकार असूनही कर्नाटक प्रश्नी महाराष्ट्र शांत का, असा सवाल विचारला जात आहे. विरोधकांनी घेरलेल्या अवस्थेत भाजप असताना राज्यातील भाजपच्या दोन नेत्यांच्या भेटीत नेमकी काय राजकीय चर्चा झाली, हे लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.