भाजप ममतांना पुन्हा चिडवणार, ‘जय श्री राम’ लिहिलेले 10 लाख कार्ड पाठवणार

| Updated on: Jun 03, 2019 | 9:03 PM

मुंबई : लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत आलेलं पश्चिम बंगाल हे राज्य आजही राजकीय घडामोडींचं केंद्रबिंदू बनलंय. सध्या या राज्यातील वातावरण जय श्री रामच्या घोषणांनी तापलंय. काही दिवसांपूर्वी ‘जय श्री राम’च्या घोषणा देणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी भडकल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर भाजपच्या 10 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला. ममतांच्या या […]

भाजप ममतांना पुन्हा चिडवणार, जय श्री राम लिहिलेले 10 लाख कार्ड पाठवणार
Follow us on

मुंबई : लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत आलेलं पश्चिम बंगाल हे राज्य आजही राजकीय घडामोडींचं केंद्रबिंदू बनलंय. सध्या या राज्यातील वातावरण जय श्री रामच्या घोषणांनी तापलंय. काही दिवसांपूर्वी ‘जय श्री राम’च्या घोषणा देणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी भडकल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर भाजपच्या 10 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला. ममतांच्या या कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपकडून गांधीगिरीचा वापर केला जाणार आहे. तर दुसरीकडे अयोध्येत राम मंदिरावरुन साधुसंत आक्रमक झाले आहेत.

निवडणुका संपल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये ‘जय श्री राम’च्या घोषणांमुळे राजकीय युद्ध सुरु असल्याचं पहायला मिळतंय. काही दिवसांपूर्वी 30 मे रोजी पश्चिम बंगालच्या 24 परगाणा येथून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा ताफा जात असताना भाजप कार्यकर्त्यांनी ‘जय श्री राम’ अशा घोषणा दिल्या. या घोषणा ऐकताच ममतांनी गाडी थांबवली. त्या गाडीतून उतरून बाहेर आल्या आणि ही घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर भडकल्या.

अतिशय संतप्त अशा अवस्थेत तिथून निघालेल्या ममता बॅनर्जी यांनी बोलल्याप्रमाणे कारवाई केलीही. पोलिसांनी भाजपच्या 10 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. त्यानंतर भाजपही आक्रमक झाली असून ममता यांना उत्तर पाठवण्यासाठी गांधीगिरीचा मार्ग अवलंबला जाणार आहे. देशभरातून ममता बॅनर्जींना 10 लाख ‘जय श्री राम’ लिहिलेली पोस्टकार्ड पाठवली जाणार आहेत. देशभरातील भाजप कार्यालयात त्याची तयारीही सुरु झाली आहे.

महाराष्ट्रातल्या वर्ध्यामध्येही ममता यांना कार्ड पाठवण्याची तयारी सुरु आहे. वर्ध्यातून जय श्री राम लिहलेली तब्बल 5 हजार कार्ड्स ममता बॅनर्जींना ठवण्यात येणार आहेत.

दरम्यान भाजपकडून जय श्री रामवरुन राजकारण केलं जात असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केलाय. तशी फेसबुक पोस्टही त्यांनी लिहिली आहे. “जय सिया राम, जय राम जी की, राम नाम सत्य है…या सर्व धार्मिक आणि सामाजिक समजुती आहेत…आम्ही या भावनांचा सन्मान करतो…भाजप धर्माला राजकारणात मिसळून धार्मिक घोषणा असलेल्या जय श्री रामचा आपल्या पक्षाच्या घोषणेच्या रुपात चुकीचा वापर करत आहे. आम्ही आरएसएसप्रमाणे दुसऱ्यांवर राजकीय घोषणाबाजी थोपण्याचा सन्मान करत नाही. बंगालने हे कधीच स्वीकारलं नाही. अत्याचार आणि हिंसेच्या माध्यमातून द्वेषाची विचारधारा पसरवण्याचा जाणूनबुजून केला जाणारा प्रयत्न आहे…” असं त्यांनी म्हटलंय.

एकीकडे बंगालमध्ये रामावरुन रण रंगलेलं असताना दुसरीकडे अयोध्येत राममंदिरासाठी संतमहंतांची बैठक झाली. त्यापूर्वी राम जन्मभूमी न्यासचे कार्यकारी अध्यक्ष राम विलास वेदांती यांनी मोठं विधान केलं. 2024 पर्यंत राममंदिराचं बांधकाम सुरु होईल, असा दावा वेदांती यांनी केला. 2020 पर्यंत जेव्हा राज्यसभेत भाजपला पूर्ण बहुमत मिळेल त्यानंतर पाच टप्प्यात हे काम सुरु होईल, असं त्यांनी सांगितलं.

एकूणच निवडणुका संपल्या असल्या तरी देशातला रामनामाचा जप काही थांबलेला नाही…जोपर्यंत राममंदिर बांधलं जात नाही…तोपर्यंत या देशातील तो कळीचा मुद्दा ठरणार आहे.