नाना पटोलेंसह मलिकांविरोधात गावोगावी तक्रारी दाखल करा, चंद्रकांतदादांचे कार्यकर्त्यांना आदेश

| Updated on: Jan 18, 2022 | 4:47 PM

हा जो हम करे सो कायदा चालला आहे. प्रशासनावर दबाव आहे. गावोगाव भाजप कार्यकर्त्यांना हैराण करण्याचं काम सुरु आहे. आता आम्ही कोर्टात जाणार आहोत. पटोले हे विधानसभा सदस्य आहेत त्यामुळे आम्ही राज्यपालांकडे तक्रार करणार आहोत', अशी माहिती पाटील यांनी दिलीय.

नाना पटोलेंसह मलिकांविरोधात गावोगावी तक्रारी दाखल करा, चंद्रकांतदादांचे कार्यकर्त्यांना आदेश
नाना पटोले, नवाब मलिक, चंद्रकांत पाटील
Follow us on

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मोदींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात राजकारण ढवळून निघालं आहे. अशावेळी पटोले यांच्याविरोधात राज्यभरात गुन्हे दाखल करण्याची आदेश भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिले आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधातही तक्रारी दाखल करा, अशा सूचना पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.

भाजप कोर्टात जाणार, राज्यपालांकडेही तक्रार करणार

‘पटोले यांनी या आठवडाभरात पंतप्रधान मोदींबाबत दोन विधानं केली. एक पंजाबमधील सुरक्षेच्या मुद्द्यावरुन त्यांनी असं वक्तव्य केलं की नौटंकी करण्यात मोदी एक्सपर्ट आहेत. तसंच अमित शाह यांचा हा कट असल्याचं ते म्हणाले होते. त्यावेळी गावोगावी भाजप कार्यकर्ते पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करायला गेले. पण पोलीस दबावाखाली काम करत आहेत. नारायण राणे यांनी नितेश कुठे आहे मला माहिती आहे म्हणल्यावर त्यांच्या घरावर नोटीस लावली. नारायण राणे म्हणाले मी असतो तर थोबाडीत मारली असती तेव्हा त्यांना अटक झाली. नारायण राणे बोलले कुठे तर महाडला आणि त्यांच्यावर गुन्हा कुठे दाखल झाला तर नाशिकला. त्याच नाशिकमध्ये बोलताना काल नाना पटोले मी मोदींना शिव्याच काय तर मारेन म्हणाले, त्याची क्लिप सोशल मीडियावर बाहेर आली आहे. त्यावर नाशिकला गुन्हा दाखल करायला तयार नाहीत. तिथे आमचे नेते, कार्यकर्ते सकाळपासून बसले आहेत. आमचे चंद्रशेखर बावनकुळे कामठीला बसले आहेत आता त्यांनाच अटक होण्याची शक्यता आहे. कांदिवलीमध्ये आमच्या अतुल भातखळकरांनाच अटक करण्यात आली. हा जो हम करे सो कायदा चालला आहे. प्रशासनावर दबाव आहे. गावोगाव भाजप कार्यकर्त्यांना हैराण करण्याचं काम सुरु आहे. आता आम्ही कोर्टात जाणार आहोत. पटोले हे विधानसभा सदस्य आहेत त्यामुळे आम्ही राज्यपालांकडे तक्रार करणार आहोत’, अशी माहिती पाटील यांनी दिलीय.

‘नवाब मलिकांविरोधातही तक्रार दाखल करा’

‘नवाब मलिक काल म्हणाले की फडणवीसांना पवारांनी कात्रजचा घाट दाखवला आताकाशीचा घाट दाखवतील. काशीचा घाट म्हणजे मृत्यू. पटोले म्हणतात मोदींना मारतो, मलिक म्हणतात फडणवीसांना काशीचा घाट दाखवू. राज्यात काय दहशतवाद सुरु आहे का? पाच वर्षे या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले फडणवीस. पवार तीन वेळा मुख्यमंत्री राहिले पण त्यांना सलग पाच वर्षे टिकता आलं नाही. वसंतरावांनंतर फडणवीस एकटे पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले. त्या फडणविसांना काशीचा घाट दाखवणार? या विषयातही राज्यात गावोगाव भाजप कार्यकर्त्यांनी मलिकांविरोधात सावधगिरीची तक्रार दाखल करावी’, अशी सूचना पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिली आहे.

‘सरनाईक प्रकरणात राज्यपाल, लोकायुक्तांकडे जाणार’

अजून दोन कारणासाठी आम्ही 22 जानेवारीला राज्यपाल आणि लोकायुक्तांचीही आम्ही भेट घेणार आहोत. आमदार प्रताप सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामावर लावलेला दंड आणि व्याज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. साधारण पद्धत असते की फाईलवर शेरा लिहायचा असतो. पण इथे आपल्याला कोण अडवणार अशा तोऱ्यात निर्णय झाला. त्यामुळे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त करा अशी मागणी आम्ही करणार आहोत. तसंच सर्व मंत्रिमंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही करणार आहोत.

इतर बातम्या :

राणेंना अटक, पटोलेंना का नाही? मुख्यमंत्र्यांची जबाबदारी, उपकार नाही, फडणवीसांचा हल्लाबोल

Uttar pradesh assembly election 2022: फॉर्ममध्ये नाव लिहा, 300 यूनिट वीज मोफत घ्या; सपाच्या ऑफरने भाजप, बसपाची कोंडी?