भाजपाला महाराष्ट्रात कधीच…. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मनातली खंत काय? यंदा इच्छा पूर्ण होणार?

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ' महाराष्ट्राचा 11 वा प्रदेशाध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातून भाजपाला एवढं बहुमत मिळवून देण्याची आपली जबाबदारी आहे.

भाजपाला महाराष्ट्रात कधीच.... चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मनातली खंत काय? यंदा इच्छा पूर्ण होणार?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 15, 2022 | 9:18 AM

पुणेः आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं नेतृत्व जगाने मान्य केलंय. पण माझ्या मनात मोठं शल्य आहे. देशातल्या अनेक राज्यांत भाजपाला मोठं बहुमत आहे. पण महाराष्ट्रात नाही, या शब्दात चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मनातील खंत बोलून दाखवली. पुण्यात सोमवारी फ्रेंड्स ऑफ BJP कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांसाठी स्फूर्तीदायक भाषण केलं. तसंच आगामी निवडणुकीत शिंदेगट (Eknath Shinde) आणि भाजपाची युती असेल हेदेखील पुन्हा एकदा स्पष्ट करून सांगितलं.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आज तुमच्या-माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. शिंदे-फडणवीसांच्या नेतृत्वात महायुतीला पाठिंबा देणं. 2024 मध्ये महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल, एवढं ताकतीचं सरकार आणायचं आपलं उद्दिष्ट आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

लोकसभा निवडणुकीतही महाराष्ट्रातून भाजपाला मोठं बहुमत मिळवण्याचं आपलं उद्दिष्ट असल्याचं बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केलं. ते म्हणाले, ‘ सध्या नरेंद्र मोदींनी या देशाला विश्वगुरू बनवण्याचं स्वप्न पाहिलं आहे. ते पूर्ण करायचं असेल तर मोदीजींच्या पाठिशी महाराष्ट्रातले 45 हात उभे राहिले पाहिजेत याकरिता महाराष्ट्रातून पाठिंबा देण्याची आपली जबाबदारी आहे.

पाहा बावनकुळे यांचं संपूर्ण भाषण-

बावनकुळे यांचा संकल्प काय?

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘ महाराष्ट्राचा 11 वा प्रदेशाध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातून भाजपाला एवढं बहुमत मिळवून देण्याची आपली जबाबदारी आहे. असं करायचं असेल तर मला आधी सुधारावं लागेल.

ज्या दिवशी मला राष्ट्रीय अध्यक्षाचा फोन आला तेव्हाच मी ठरवलं. आठवड्यातला फक्त एक दिवस घरी जाईन. सोमवार ते शनिवार काम करेन. फक्त रविवारी घरी जाईन. जीवनातले 16 तास भाजपासाठी वापरेन. हा संकल्प विधानसभेच्या उमेदवारांसाठी मतदान होईपर्यंत… त्या दिवशी 5 वाजेपर्यंत हा संकल्प मी स्वीकारला आहे..

हा संकल्पपूर्तीकरिता मला पुण्यातल्या देवदुर्लभ कार्यकर्त्यांची गरज आहे, अशी भावना चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. आजपासून आपण सर्वांनीच तीन पक्षांच्या विरुद्ध लढायचंय…