CM Eknath Shinde : सभागृहात दोन मुलांच्या आठवणीने एकनाथ शिंदे भावूक, सभागृहात अश्रू अनावर; शिवसैनिक म्हणून संपूर्ण जीवनपट उलगडला

| Updated on: Jul 04, 2022 | 3:54 PM

एकनाथ शिंदे यांनी सभागृहाला संबोधित केलं. त्यावेळी शिंदे सभागृहात भावूक झाले. दिघे साहेबांच्या काळात शिवसैनिक म्हणून आपला जीवनपट एकनाथ शिंदे यांनी उलगडला. त्यावेळी बोलताना शिंदे आपल्या दोन मुलांच्या मृत्यूने गहिवरले. त्यांना अश्रू अनावर झाले.

CM Eknath Shinde : सभागृहात दोन मुलांच्या आठवणीने एकनाथ शिंदे भावूक, सभागृहात अश्रू अनावर; शिवसैनिक म्हणून संपूर्ण जीवनपट उलगडला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे सरकारकडून (Shinde Government) विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. 164 आमदारांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बाजूनं मतदान केलं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. तर ठरावाविरोधात 99 मतं पडली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सभागृहाला संबोधित केलं. त्यावेळी शिंदे सभागृहात भावूक झाले. दिघे साहेबांच्या काळात शिवसैनिक म्हणून आपला जीवनपट एकनाथ शिंदे यांनी उलगडला. त्यावेळी बोलताना शिंदे आपल्या दोन मुलांच्या मृत्यूने गहिवरले. त्यांना अश्रू अनावर झाले. त्यावेळी बाजूला बसलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांना खाली बसण्याचीही विनंती केली. तसंच त्यांना पिण्यासाठी पाणीही दिलं. पाणी घेतल्यानंतर शिंदे यांनी पुढे बोलायला सुरुवात केली.

‘दोन मुलांच्या आठवणीने एकनाथ शिंदे भावूक’

सभागृहात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, माझे वडील खुप कष्ट करुन त्यांनी मला इथपर्यंत आणलं. मी घरी जायचो तेव्हा आई-वडील झोपलेले असायचे आणि मी उठण्यापूर्वी ते कामाला निघून घायजे. तेच माझा मुलगा श्रीकांतबाबत घडलं. मी पूर्ण वेळ संघटनेसाठी दिला. मी शिवसैनिक म्हणून जगलो. माझ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. माझी दोन मुलं गेली. माझं कुटुंब उद्ध्वस्त झालो होतो. मी ठरवलं होतं की आता फक्त कुटुंबासाठी वेळ द्यायचा. पण दिघे साहेब माझ्याकडे दोनदा, तिनदा, पाचवेळा आले. त्यांनी एकदा मला टेंभीनाक्यावर बोलावलं आणि सांगितलं की आता तुला तुझे अश्रू तर पुसायचे आहेतच, सोबतच जनतेचे अश्रू पुसायचे आहेत. दिघेसाहेब माझ्यासाठी दैवत होते, असं भावनिक भाषण एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केलं.

‘मला अभिमान आहे या 50 लोकांचा’

स्वत:चं मंत्रीपद दावावर लावून मी 50 आमदारांना घेऊन समोर बसलेल्या बलाढ्य सरकारविरोधात बंड पुकारलं. समोर सत्ता, यंत्रणा, एवढी मोठी माणसं होती. दुसरीकडे बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा सैनिक. मला अभिमान आहे या 50 लोकांचा. आपण हे मिशन सुरु केलं तेव्हा कोणी विचारलं नाही. कुठे चाललोय, कधी चाललोय, किती वेळ लागणार कुणी विचारलं नाही. मी मतदानादिवशी आलो तेव्हा डिस्टर्ब होतो. मला बाळासाहेबांनी सांगितलेलं आठवलं की अन्यायाविरोधात बंड पुकारलं पाहिजे. आम्हाला अनेक फोन आले. पण मला आमच्यातील एकही आमदार मुख्यमंत्र्यांना भेटून पुढे जाऊयात असं म्हणाला नाही, हा विश्वास आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे आनंद दिघेंच्या आठवणीत रमले

शिंदे पुढे म्हणाले की, ही छोटी मोठी घटना नाही. जे ग्रामपंचायत सदस्य, नगर पंचायत सदस्यही इकडे तिकडे हलू देत नाही. पण हे एवढं मोठं का झालं, काय घडलं, कशामुळे झालं? शिवसैनिक म्हणून 25 वर्षे एकनाथ शिंदेनं रक्ताचं पाणी केलं. 17 वर्षाचा होतो तेव्हा बाळासाहेबांच्या विचाराने मी वेडा झालो आणि शिवसैनिक झालो. एका प्रकरणात मी आनंद दिघेंच्या संपर्कात आलो. वयाच्या 18 व्या वर्षी शाखाप्रमुख झालो. अनेकजण वरिष्ठ होते. त्यांना बोललो की यांना करा, तर माझ्या खांद्यावर हात टाकून बोलले, मला शिकवतो का? असं एक गोष्टही शिंदे यांनी सांगितलं.