मोठी बातमी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, अमित शाहांसोबतही बैठक, नेमकं कारण काय?

| Updated on: Sep 21, 2021 | 10:38 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी दिल्ली दौऱ्यावर असणार आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. वाढत्या नक्षलवादी कारवाईच्या संदर्भात अमित शाह यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

मोठी बातमी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, अमित शाहांसोबतही बैठक, नेमकं कारण काय?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी दिल्ली दौऱ्यावर असणार आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. वाढत्या नक्षलवादी कारवाईच्या संदर्भात अमित शाह यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातील नक्षलवादी कारवायाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर सोमवारी आढावा बैठक पार पडली होती. त्यानंतर आता रविवारी मुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत. (CM Uddhav Thackeray on a visit to Delhi on Sunday, Amit Shah called a meeting on issue of Naxalism)

नक्षलवादी चळवळ आता दुर्गम भागातून शहरांकडे वळत असल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी 26 सप्टेंबर रोजी देशातील नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला जाण्यापूर्वी सोमवारी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत राज्यातील नक्षलवाद विषयक आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर आता उद्धव ठाकरे राज्यातील नक्षलवादी कारवायांबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांना माहिती देतील.

मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये पत्रसंघर्ष

दरम्यान, आजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिलेल्या पत्रानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यपालांनी साकीनाक्याच्या घटनेवरून दोन दिवसांचं अधिवेशन बोलवण्याची सूचना मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहून केली आहे. त्यावर उत्तराखंडमध्ये नेमकं काय चाललं आहे याची आकडेवारीच मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तुम्ही देवभूमीचे सुपुत्र आहात. उत्तराखंडमध्ये महिला अत्याचारांवरील घटनेत दीडशे टक्क्याने वाढ झाली आहे, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना आरसाच दाखवला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दीर्घ पत्रं लिहिलं आहे. त्यात महिला अत्याचाराचा मुद्दा कसा देशव्यापी आहे आणि उत्तराखंडची स्थिती काय आहे यावर चर्चा केली आहे. उत्तराखंड ही तर देवभूमीच म्हणावी लागेल. आपण स्वतः या देवभूमीचे सुपूत्र आहात. मुख्यमंत्री म्हणून या राज्याचे नेतृत्व आपण केले आहे. उत्तराखंडच्या देवभूमीचा महिलांवरील अत्याचारांचा आलेख देखील चढता आहे. देवभूमीत महिलांवरील अत्याचारांत दीडशे टक्क्यांनी वाढ झाल्याचे सरकारी आकडेच सांगत आहेत. हरिद्वार, डेहराडूनसारख्या शहरांत महिलांवरील बलात्कार, हत्येचे गुन्हे सतत वाढत आहेत. हुंडाबळी, महिलांच्या अपहरणाचे गुन्हेही वाढत आहेत. यावर काय उपाय योजना करावी बरे? तेथेही विधिमंडळाचे खास सत्र बोलवू शकतो काय?, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

संसदेचं चार दिवसाचं अधिवेशन बोलवा

साकीनाक्यातील घटनेने राज्यपाल म्हणून आपण महिलांवरील अत्याचारांबाबत चिंता व्यक्त केली. हीच चिंता आम्हालाही आहेच. हा विषय साकीनाक्यापुरता मर्यादित नसून राष्ट्रव्यापी आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील पीडित महिला आपल्याकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. म्हणून राष्ट्रातील महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदेचे चार दिवसांचे विशेष सत्र बोलवावे, अशी मागणी राज्यपाल महोदयांनी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहांकडे करावी. त्याच सत्रात साकीनाका घटनेवरही चर्चा करता येईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

इतर बातम्या :

ना राज्यपालांवर बोलले, ना सोमय्यांवर, पवार थेट ललित मोदींवर बोलले! नेमके काय म्हणाले? वाचा सविस्तर

‘राज्यपालांनी विरोधकांचं थोबाड फोडलं पाहिजे, पण ते उत्तेजन देतात’, संजय राऊतांचा घणाघात

CM Uddhav Thackeray on a visit to Delhi on Sunday, Amit Shah called a meeting on issue of Naxalism