आम्हाला कुणी थप्पड देण्याची भाषा करु नये, अशी थप्पड मारु की कोणी उठणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा

मुंबईने, मराठी माणसाने रक्त सांडलं आहे. स्वतःची हक्काची घरं झाल्यावर मोहाला बळी पडू नका" असा सल्लाही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रहिवाशांना दिला.

आम्हाला कुणी थप्पड देण्याची भाषा करु नये, अशी थप्पड मारु की कोणी उठणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Reporter Hemant Birje | Edited By: Anish Bendre | Updated on: Aug 01, 2021 | 1:55 PM

मुंबई : “हे ट्रिपल सीट सरकार आहे. आता कोणी कौतुक केलं, की भीती वाटते. थप्पड से नही… थप्पड मारण्याची भाषा कोणी करू नये. अशी थप्पड मारु की कोणी उठणार नाही” असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विरोधकांना दिला. मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील (Worli BDD Chawl Redevelopment) पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. खासदार शरद पवार (Sharad Pawar) आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शुभारंभ झाला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“आज भूमिपूजन केले, 36 महिन्याने आपण सगळे एकत्र चाव्या देऊ. आयुष्य काही-काही क्षण अनपेक्षितपणे येत असतात. मुख्यमंत्रिपद स्वप्नात नव्हते. आता त्याच्या खोलात जात नाही, ते स्वीकारले. लहानपणापासून या परिसरात येणं आहे. शिवसेना प्रमुखांसोबत यायचो. भूमिपूजन मी मुख्यमंत्री असताना होईल, हे स्वप्नात पाहिले नाही. माझ्यावर लोकांनी पुष्पवृष्टी केली. पण आम्ही लोकांच्या ऋणात आहोत. मुंबईने, मराठी माणसाने रक्त सांडलं आहे. स्वतःची हक्काची घरं झाल्यावर मोहाला बळी पडू नका” असा सल्लाही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रहिवाशांना दिला.

पाहा व्हिडीओ :

कशी झाली बीडीडीची स्थापना?

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असून शासनाने या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी म्हाडाची सुकाणू अभिकरण (Nodal Agency) म्हणून नियुक्ती केली आहे. बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेता या प्रकल्पाकडे नागरी पुनरुत्थानाचा आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून पाहिले जाते. सन 1920 ते 1924 या कालावधीत औद्योगिकरणामुळे शहरी भागांतून घरांची कमतरता प्रामुख्याने जाणवू लागली होती. त्यामुळे मुंबई प्रोव्हिन्शिअल राज्याचे तत्कालीन राज्यपाल सर जॉर्ज लॉइड यांनी  बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट म्हणजेच बीडीडीची स्थापना करून मुंबई शहरात गृहनिर्मितीची योजना तयार केली.

शंभर वर्षांचा ऐतिहासिक वारसा

या योजनेअंतर्गत वरळी, एन. एम. जोशी मार्ग परळ , नायगाव आणि शिवडी येथे सुमारे 92 एकर जागेवर बीडीडी चाळींची उभारणी करण्यात आली. या चाळींमध्ये औद्योगिक कामगार आणि गिरणी कामगार वर्ग प्रामुख्याने राहू लागला. शंभर वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बीडीडी चाळींमध्ये तर अनेक साहित्यिक, राजकीय नेते, कलाकार अशी अनेक प्रतिष्ठित महापुरुष वास्तव्यास होते. तसेच मुंबईच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणीत चाळींचा सर्वात मोठा वाटा आहे.

संबंधित बातम्या :

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील बांधकामाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

(CM Uddhav Thackeray warns opposition at BDD Chawls redevelopment construction Inauguration in Worli Mumbai)

Follow Us