नारायण राणेंच्या खांद्यावरुन भाजपची राष्ट्रपती राजवटीची मागणी का? : काँग्रेस

| Updated on: Jul 07, 2020 | 1:20 PM

“जो मुख्यमंत्री मंत्रालयात बसू शकत नाही तो मुख्यमंत्री कशाला हवा, हा मुख्यमंत्री निष्क्रिय आहे,” अशी खरपूस टीका नारायण राणे यांनी काल उद्धव ठाकरेंवर केली.

नारायण राणेंच्या खांद्यावरुन भाजपची राष्ट्रपती राजवटीची मागणी का? : काँग्रेस
Follow us on

मुंबई : खासदार नारायण राणे यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत राष्ट्रपती राजवटीची मागणी केली. राणेंच्या खांद्यावरुन मागणी करण्याऐवजी भाजपने खुलेआम सांगावे, असे आवाहन काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले. (Congress asks is BJP demanding Presidential Rule keeping gun on Narayan Rane shoulder)

“राष्ट्रपती राजवटीची नारायण राणे यांची मागणी वैयक्तिक आहे. भाजपची ती अधिकृत मागणी नाही, असे सुधीर मुनगंटीवार सांगत होते. आता तीच मागणी राणेंनी भाजप कार्यालयातून केली आहे. भाजप नारायण राणे यांचा खांदा का वापरत आहे? खुलेआम ‘मन की बात’ सांगा. लोकांना तुमचा कुटील डाव कळू तर दे” असे ट्वीट सचिन सावंत यांनी केले.

हेही वाचा : जो मंत्रालयात येऊ शकत नाही, तो मुख्यमंत्री हवाच कशाला? : नारायण राणे

“जो मुख्यमंत्री मंत्रालयात बसू शकत नाही तो मुख्यमंत्री कशाला हवा, हा मुख्यमंत्री निष्क्रिय आहे,” अशी खरपूस टीका नारायण राणे यांनी काल उद्धव ठाकरेंवर केली. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी केला.

नारायण राणे काय म्हणाले?

“हाकेच्या अंतरावर मंत्रालय आहे. पण मंत्रालयात मुख्यमंत्रीच नाही. त्यामुळे हे सरकार खरंच अस्तित्वात आहे का, जो मुख्यमंत्री मंत्रालयात बसूच शकत नाही, तो कशाला हवा. हा मुख्यमंत्री निष्क्रीय आहे. हा प्रशासन चालवू शकत नाही. जनतेची परिस्थिती थांबवू शकत नाही. महाराष्ट्राच्या जनतेसाठी हे सरकार घातक आहे. महाराष्ट्रात कोरोनाने असंख्य मृत्यू होत आहे. त्यामुळेच हे सरकार सत्तेत राहणे योग्य नाही. त्यासाठीच मी राष्ट्रपती राजवटीची मागणी केली होती,” असेही राणे यावेळी म्हणाले.

“महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाही, मंत्रालय नाही, सामान्य माणसाची कुणाला चिंता नाही. बदल्या कोण करतंय कळत नाही, ताळमेळ नाही, काय चाललंय काही समजत नाही,” असेही राणे यावेळी म्हणाले.

हेही पाहा : TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर! 

“हा मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेरच पडत नाही, तो काय काम करणार, असा मुख्यमंत्री कुठे सापडणार नाही आणि कुणी ठेवणार पण नाही. दयनीय अवस्था राज्याची असताना हा मुख्यमंत्री डोळे मिटून फक्त लॉकडाऊन करा एवढच बोलतोय,” अशी बोचरी टीका नारायण राणे यांनी केली होती.

“मुख्यमंत्र्यांना पंढरपूरच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला. पण त्यांनी तिथे जाऊन काय केलं. हिंदू आहेत ना, मग विठोबाचं दर्शन केलं का, मग तिकडे जाऊन काय केलं?” असेही नारायण राणे म्हणाले.

पहा व्हिडीओ:

(Congress asks is BJP demanding Presidential Rule keeping gun on Narayan Rane shoulder)