पंचायत समिती सदस्य ते काँग्रेसच्या राष्ट्रीय राजकारणातील प्रमुख मोहरा, राजीव सातवांची राजकीय कारकीर्द

| Updated on: May 17, 2021 | 4:06 PM

राहुल गांधींशी जवळीक वाढली आणि ते राहुल ब्रिगेडच्या प्रमुख सदस्यांपैकी एक झाले. | Rajiv Satav congress

पंचायत समिती सदस्य ते काँग्रेसच्या राष्ट्रीय राजकारणातील प्रमुख मोहरा, राजीव सातवांची राजकीय कारकीर्द
राजीव सातव, काँग्रेस
Follow us on

मुंबई: काँग्रेसचे नेते राजीव सातव यांच्यावर सोमवारी हिंगोलीतील त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोनाची लागण झाल्याने पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर अनेक दिवस उपचार सुरु होते. मात्र, कोरोनातून बरे झाल्यानंतर सायटोमेगॅलो या विषाणूचा संसर्ग झाल्याने रविवारी राजीव सातव (Rajiv Satav) यांचे निधन झाले होते. राजीव सातव यांच्यासारखा तरुण, उमदा आणि कर्तृत्ववान नेता गमावल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. (Congress leader Rajiv Satav Political journey)

कोण होते राजीव सातव?

45 वर्षीय राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) चे गुजरात प्रभारी होते, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक होते. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव 2014 मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते. राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2014 या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं.

पंचायत स्तरापासून राजकारणाची सुरुवात

राजीव सातव यांनी आपली राजकीय कारकीर्द पंचायत समितीपासून सुरू केलेली पण तरी फार कमी काळात त्यांनी दिल्लीत स्वत:ची ओळख निर्माण केली. राजीव सातव यांनी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य म्हणून काम केले. त्यामुळे राजीव सातव यांना ग्रामीण प्रश्नांची जाण होती.

त्यामुळे संसदेत राजीव सातव यांनी तळागाळातील लोकांच्या समस्यांवर आवाज उठवला होता. मनरेगा, दुष्काळ, शेती, रेल्वेपासून ते IIM आणि कंपनी कायद्याच्या प्रश्नांवरही त्यांनी लोकसभेत प्रभावीपणे आपली भूमिका मांडली होती. संसदेत 1075 प्रश्न विचारत 205 वादविवादांमध्ये सातव सहभागी झाले होते. राजीव सातव यांची 81 टक्के उपस्थितीही उल्लेखनीय होती. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

मुलाखतीच्या माध्यमातून निवडलेला युवक काँग्रेसचा पहिला अध्यक्ष

वशिलेबाजी आणि लॉबिंगचे राजकारण चालणाऱ्या काँग्रेसमध्ये राजीव सातव यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. ते मुलाखतीचे माध्यमातून निवडला गेलेला युवका काँग्रेसचा पहिला अध्यक्ष होते. राहुल गांधी यांनी तासभर मुलाखत घेऊन मगच सातव यांची नियुक्ती केली होती.

राजीव सातव यांचीही तेव्हा कॉर्पोरेट क्षेत्राप्रमाणेच मुलाखत घेण्यात आली. पक्षासाठी काय करणार, पक्ष वाढीसाठी कार्यक्रम काय आहे, असे विविध प्रश्न तेव्हा सातव यांना विचारण्यात आले. सातव यांनी सादरीकरणाने राहुल गांधी हे प्रभावित झाले होते. त्यानंतर राजीव सातव यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली होती.

राहुल गांधींचे विश्वासू सहकारी

युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावेळी घेतलेल्या मुलाखतीत राजीव सातव सातव यांच्या सादरीकरणाने राहुल गांधी प्रचंड प्रभावित झाले होते. त्यामुळे राहुल गांधी यांच्या विश्वासातील युवा नेत्यांच्या फळीत त्यांना स्थान मिळाले. तब्बल चार वर्षं ते राष्ट्रीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष राहिले. त्यामुळे त्यांची राहुल गांधींशी जवळीक वाढली आणि ते राहुल ब्रिगेडच्या प्रमुख सदस्यांपैकी एक झाले.

(Congress leader Rajiv Satav Political journey)