केंद्राने अंदाजपत्रकात लसीकरणासाठी 35 हजार कोटी राखून ठेवले होते, ते गेले कुठे? – पृथ्वीराज चव्हाण

| Updated on: May 21, 2021 | 10:00 PM

लसीकरणाबाबत केंद्र सरकारचं धोरण पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्विराज चव्हाण यांनी केलाय.

केंद्राने अंदाजपत्रकात लसीकरणासाठी 35 हजार कोटी राखून ठेवले होते, ते गेले कुठे? - पृथ्वीराज चव्हाण
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण
Follow us on

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने कोरोना लसीकरण मोहिमेवर भर दिलाय. अशावेळी लसीकरणाबाबत केंद्र सरकारचं धोरण पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्विराज चव्हाण यांनी केलाय. केंद्राने योग्य वेळी लसींना परवानगी न दिल्यामुळे सातारा जिल्ह्यातील मागील 10 दिवसापासून लसीकरण सेवा विस्कळीत झाली असल्याचं चव्हाण म्हणाले. केंद्र सरकारने सर्व लस खरेदी केली पाहिजे. राज्य सरकार किंवा खाजगी संस्थावर हि जबाबदारी ढकलू नये. अन्यथा लसीकरणासाठी खाजगी संस्था मोठी किमंत आकारु शकतात, अशी भीतीही चव्हाण यांनी व्यक्त केलीय. (Prithviraj Chavan criticizes Modi government over corona vaccination)

जगभरात सर्व देश मोफत लसीकरण करत असताना भारतात केंद्र सरकार मोफत लसीकरण का करु शकत नाही? केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकानुसार सरकारने लसीकरणासाठी 35 हजार कोटीचा निधी राखून ठेवला होता. मग ते 35 हजार कोटी गेले कुठे? असा सवालही चव्हाण यांनी केंद्राला विचारलाय. पृथ्वीराज चव्हाण यांनी यापूर्वीही कोरोना लसीकरणावरुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

‘नॉन परफॉर्मिंग अॅसेट’

पृथ्वीराज चव्हाण यांनी 13 मे रोजी पंतप्रधान मोदी यांचा एक फोटो ट्वीट केला आहे. त्यावर देशातील सर्वात मोठे ‘नॉन परफॉर्मिंग अॅसेट’ असं लिहिलेलं आहे. चव्हाण यांनी ट्वीट केलेला हा फोटो चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचबरोबर चव्हाण यांनी गंगा नदीत वाहून येत असलेल्या मृतदेहांवरुनही भाजपवर जोरदार टीका केली आहे. एक फोटो ट्वीट करत त्यात कोविड रुग्णांचा खरा आकडा आता गंगा नदीत सापडण्यास सुरुवात झाल्याचं या फोटोमध्ये म्हटलंय.

‘फक्त भाषणबाजी नको, काम दाखवा’

काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाळ आणि पवन खेडा यांनी भाजप आणि पर्यायानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. म्युकरमायकोसिसचा सामना करताना केंद्र सरकारच्या तयारीवरुन काँग्रेसनं काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या महामारीपासून वाचण्यासाठी सरकार काय मार्ग आखत आहे? असा प्रश्न काँग्रेस नेत्यांनी विचारलाय.

जेव्हा लोक आमच्यावर निशाणा साधतात आणि विचारतात की विरोधी पक्ष कुठे आहे? मात्र आता तेच लोक सरकार कुठे आहे? असा प्रश्न विचारत आहेत, अशी टीका पवन खेडा यांनी भाजपवर टीका केलीय. विरोधी पक्ष जमिनीवर काम करतोय आणि सरकार पूर्णपणे गायब असल्याचा टोला पवन खेडा यांनी लगावलाय. पंतप्रधान मोदी आता खरं बोलत आहेत. मात्र, त्यांना मागील वर्षीच इशारा दिला होता. आमचे नेते राहुल गांधी यांनी इशारा दिला होता की, कोरोनाची त्सुनामी येतेय. तेव्हा त्यांना ट्रोल करण्यात आलं. मात्र, आता मोदींना हे पटलं आहे की, कोरोना विरोधातील लढाई अजून बराच काळ चालेल, अशी टीका के. सी. वेणुगोपाळ यांनी केलीय.

संबंधित बातम्या : 

पुण्यात लसीकरणाच्या नावाने भाजप नगरसेवकांकडून नागरिकांची गोपनीय माहिती चोरी, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

VIDEO: डॉक्टरांशी बोलताना पंतप्रधान मोदी भावूक; लेकरांची काळजी घेण्याचाही सल्ला

Prithviraj Chavan criticizes Modi government over corona vaccination