माळेगाव साखर कारखान्यावर झेंडा, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Feb 25, 2020 | 10:41 AM

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत निळकंठेश्वर पॅनलला 21 पैकी 16 जागांवर विजय मिळाला

माळेगाव साखर कारखान्यावर झेंडा, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Follow us on

मुंबई/बारामती : माळेगाव साखर कारखाना पाच वर्षांपूर्वी आमच्या हातातून गेला, आता पुन्हा आमच्या विचारांचे लोक तिथे निवडून आले आहेत. मी सर्व सभासदांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत निळकंठेश्वर पॅनलला 21 पैकी 16 जागांवर विजय मिळाला आहे, तर सत्ताधारी चंद्रराव तावरेंच्या पॅनेलला अवघ्या पाच जागा मिळवण्यात यश आलं आहे. निवडणुकीत विजयश्री मिळवत अजित पवारांनी 2015 च्या पराभवाचा वचपा काढला. (Ajit Pawar on Malegaon Result)

सहकार बचाव पॅनलचे प्रमुख आणि कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवारांनी सत्तेचा गैरवापर केला. प्रलोभन, दडपशाही आणि पैशाचा अमर्याद वापर त्यांनी केला. निवडणूक काळात अजित पवारांनी मतदारांना मोठ्या प्रमाणात पैसे दिले. पैशाच्या जीवावर अजित पवारांनी निवडणूक जिंकली, असा आरोप रंजन तावरे यांनी केला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असताना त्यांनी कारखान्यात लक्ष घालणं अयोग्य, असल्याचंही तावरे म्हणाले.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘निळकंठेश्वर पॅनल’विरोधात सत्ताधारी चंद्रराव तावरे यांच्या समर्थकांचा ‘सहकार बचाव पॅनल’ निवडणुकीच्या रिंगणात होता. साखर कारखान्याच्या संचालक मंडळावरील 21 जागांसाठी निवडणूक रिंगणात एकूण 56 उमेदवार होते. यामध्ये 14 अपक्ष उमेदवारांचाही समावेश होता.

विजयी उमेदवारांची यादी – इथे क्लिक करा

‘सहकार बचाव पॅनल’च्या रंजन तावरे यांनी मतमोजणीला आक्षेप घेतल्यामुळे काल सकाळी (24 फेब्रुवारी) सुरु झालेली मतमोजणी काही काळ थांबली होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही मतमोजणीची प्रक्रिया सुरु राहिली. बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी (23 फेब्रुवारी) मतदान झालं होतं, तब्बल 92 टक्के मतदान झाल्याने निळकंठेश्वर पॅनल आणि सहकार बचाव पॅनलमध्ये मोठी चुरस निर्माण झाली होती.

शरद पवारांचा कारखाना

माळेगाव हा शरद पवार यांचा कारखाना म्हणूनच ओळखला जातो. शरद पवार हे या कारखान्याचे सभासद आहेत. आतापर्यंत 1997 आणि 2015 च्या निवडणुका वगळता या कारखान्यावर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. मात्र मागील निवडणुकीपूर्वी केंद्र आणि राज्यातील सत्ता गेल्यानंतर माळेगाव कारखानाही राष्ट्रवादीच्या हातून गेला होता.

2015 मध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढून कारखाना ताब्यात घेण्यासाठी अजित पवार यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवायची, असा चंगच अजित पवारांनी बांधला होता. (Ajit Pawar on Malegaon Result)