Devendra Fadnavis : ‘बाबरी पाडायला गेलो तेव्हा माझं वजन 128 होतं, वजनदार लोकांपासून सावध राहा’ फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा

| Updated on: May 15, 2022 | 8:52 PM

बाबरी मशिदीच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांनी ‘तुम्ही खरच तिकडे गेला होतात तर नुसता चढायचा प्रयत्न केला असता तरी बाबरी तुमच्या वजनाने खाली आली असती’, असा जोरदार टोला लगावला होता. त्यावर आता 'बाबरी पाडायला गेलो होतो तेव्हा माझं वजन 128 होतं. वजनदार लोकांपासून सावध राहा', असा इशाराच फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलाय.

Devendra Fadnavis : बाबरी पाडायला गेलो तेव्हा माझं वजन 128 होतं, वजनदार लोकांपासून सावध राहा फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
Follow us on

मुंबई : मुंबई महापालिका आणि राज्यातील अन्य महापालिका निवडणुकीच्या (Municipal Election) तोंडावर राज्यात जोरदार टीका आणि आरोप प्रत्यारोप सुरु झालेत. शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बीकेसीतील मैदानावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर रविवारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय. बाबरी मशिदीच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांनी ‘तुम्ही खरच तिकडे गेला होतात तर नुसता चढायचा प्रयत्न केला असता तरी बाबरी तुमच्या वजनाने खाली आली असती’, असा जोरदार टोला लगावला होता. त्यावर आता ‘बाबरी पाडायला गेलो होतो तेव्हा माझं वजन 128 होतं. वजनदार लोकांपासून सावध राहा’, असा इशाराच फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलाय.

‘हाच फडणवीस तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला पाडल्याशिवाय राहणार नाही’

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धवजी म्हणाले देवेंद्र फडणवीसांनी पाय ठेवला असता तरी बाबरी ढाचा खाली आला असता. केवढा विश्वास आहे बघा. मी लपवत नाही, आज माझं वजन 102 किलो आहे. बाबरी पाडायला गेलो होतो तेव्हा 128 किलो होतं. पण उद्धवजींना ही भाषा नाही समजत. त्यांना कळणाऱ्या भाषेत सांगतो की, सामान्य माणसाचा एफएसआय जर एक असेल तर माझा 1.5 आहे. बाबरी पाडायला गेलो होतो तेव्हा माझा एफएसआय 2.5 होता. पण उद्धवजी तुम्हाला असं वाटतंय की माझ्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही माझं राजकीय वजन कमी कराल. पण हाच देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली आणल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा की माननीय बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना मैद्याचं पोतं म्हणायचे. उद्धवजी त्यात मैद्याच्या पोत्याच्या पायाशी नाक घासून तुम्ही मुख्यमंत्री झालाय. वजनदार लोकांच्या नादी लागू नका’, असा जोरदार पलटवार फडणवीस यांनी केला.

हे सुद्धा वाचा

‘1992 च्या नोव्हेंबरमध्ये बाबरी पाडायला गेलो होतो’

मी जेव्हा म्हणालो की रामजन्म भूमीच्या आंदोलनात तुमचा एकही शिवसैनिक नव्हता तर किती मिर्ची लागली. अरे हा मी गेलो होतो बाबरी पाडण्याकरता त्याचा मला अभिमान आहे. 1992 साली फेब्रुवारीत मी नगरसेवक झालो, जुलैमध्ये मी वकील झालो आणि नोव्हेंबरमध्ये अॅड. नगरसेवक देवेंद्र फडणवीस बाबरी पाडायला गेला होता. लाठी गोली खायेंगे, मंदिर वही बनायेंगे असं म्हणत आम्ही अयोध्येला गेलो होतो. तुम्ही सहलीला गेला होतात. पहिला कारसेवा झाली आणि कोठारी बंधूंना मारलं तेव्हाही हा देवेंद्र फडणवीस अयोध्येत गेला होता. फक्त गेलाच नव्हता तर बदायूच्या जेलमध्ये गेला होता. तिथे आम्ही वाट पाहत होतो की कुणीतरी शिवसेनेचा येईल. पण कुणीच नाही आला. त्यापूर्वी 19 व्या वर्षी काश्मीरमध्ये हिंदूंवर अन्याय झाला तेव्हाही तिथे गेलेला हा देवेंद्र फडणवीस आहे, अशा शब्दात फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर प्रतिहल्ला केला.