भाजप नेते दिल्लीत, चंद्रकांत पाटलांना हटवलं जाणार? फडणवीसांचं पहिल्यांदाच उत्तर

| Updated on: Aug 07, 2021 | 10:22 PM

राज्यात भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदलाची शक्यता वर्तवली जात आहे. त्याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये कुठलेही संघटनात्मक बदल होणार नसल्याची माहिती दिलीय.

भाजप नेते दिल्लीत, चंद्रकांत पाटलांना हटवलं जाणार? फडणवीसांचं पहिल्यांदाच उत्तर
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
Follow us on

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीवारीची चर्चा सध्या जोरात आहे. पंकजा मुंडेही दिल्ली दरबारी दाखल होणार असल्याची माहिती मिळतेय. अशावेळी राज्यात भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदलाची शक्यता वर्तवली जात आहे. त्याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये कुठलेही संघटनात्मक बदल होणार नसल्याची माहिती दिलीय. तसंच ही दिल्लीवारी फक्त महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी असल्याचंही फडणवीस म्हणाले. ते आज पुण्यात माध्यमांशी बोलत होते. (No organizational change in BJP – Devendra Fadnavis)

भाजपमध्ये कुठलेही संघटनात्मक बदल होणार नाहीत. नव्या मंत्र्यांच्या भेटीगाठीसाठी आम्ही दिल्लीला जात आहोत. तसंच महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी हा दौरा आहे. राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलण्याचीही चर्चा नाही. चंद्रकांत पाटील चांगलं काम करत आहेत. पक्ष त्यांच्या पाठीशी आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. कृपया कंड्या पिटवू नका, असं देवेंद्र फजणवीस यांनी म्हटलंय. त्याचबरोबर मातंग, बोरड, चर्मकार, वाल्मिकी सुदर्शन समाजापर्यंत आरक्षण पोहोचलं नाही. ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वर्गवारी करावी लागेल. आज आरक्षणानंतरही अनेक समाज मागे आहे. त्यामुळे दीर्घकाळ आरक्षण सुरु ठेवावं लागेल. जो वंचित समाज आजही आरक्षणापासून दूर आहे. त्यांना कशाप्रकारे मुख्य प्रवाहात घेता येईल याबाबत विचार सुरु असल्याचंही फडणवीस म्हणाले.

‘..तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका नको’

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसींना आरक्षण मिळालं नाही तर काँग्रेसकडून ओबीसींच्या 30 टक्के उमेदवारांना निवडणुकीचे तिकीट देण्यात येईल, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. त्याबाबत विचारलं असता नाना पटोले काय म्हणाले हे ऐकलं नाही. मी त्यावर भूमिका मांडणार नाही. एवढंच सांगतो की भाजपची भूमिका स्पष्ट आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण मिळत नाही तोवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत, असंही फडणवीसांनी स्पष्ट केलंय.

नाना पटोले नेमकं काय म्हणाले?

नागपूरमध्ये नाना पटोले यांनी ही घोषणा केली. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळेल की नाही याबाबत संभ्रम आहे. आरक्षण मिळालं नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस ओबीसींना 27 टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे 30 टक्के जागा देणार, अशी घोषणा पटोले यांनी केली आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसींचा मुद्दा असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या :

… तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस ओबीसींना 30 टक्के जागा देणार; नाना पटोले यांची मोठी घोषणा

आदित्य ठाकरेंकडे पालिकेची जबाबदारी, वरुण सरदेसाईंकडे युवा सेनेचा भार, तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय होणार?; वाचा शिवसेनेत चाललंय काय?

No organizational change in BJP – Devendra Fadnavis