महिला मतदारांमुळे बिहारच्या एक्झिट पोल्सचे अंदाज चुकले, देवेंद्र फडणवीसांचे निरीक्षण

| Updated on: Nov 11, 2020 | 1:21 PM

बिहार एक्झिट पोल्समध्ये एनडीएची सत्ता खालसा होऊन महागठबंधन सरकार येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती

महिला मतदारांमुळे बिहारच्या एक्झिट पोल्सचे अंदाज चुकले, देवेंद्र फडणवीसांचे निरीक्षण
Follow us on

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Vidhansabha Election) महिलांनी सर्वाधिक मतदान केलं. जे बोलत नाहीत, पण मतदान करतात, त्यामुळेच एक्झिट पोल (Bihar Exit Polls) चुकतात, असं निरीक्षण विरोधीपक्ष नेते आणि बिहारचे भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नोंदवलं. (Devendra Fadnavis shares observation why Bihar Exit Polls went wrong)

“मला वाटतं की एक प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वासाची ही लाट आहे. याचं कारण मी बिहारमध्ये बघितलं 15 वर्षांचं सरकार होतं. अँटी इन्कम्बन्सी असते. पण मोदींबाबत प्रो इन्कम्बन्सी होती. लॉकडाऊनमध्ये बिहारमध्ये गेलेल्या मजुरांची नीट सोय झाली, बिहारमध्ये पूर आला, त्यांनाही मदत केली. लोकांना वाटलं आपल्या पाठीशी उभं राहणारे मोदीजी आहेत. त्याचाच भाग म्हणून मोदींवर विश्वास टाकण्यात आला आणि मतात रुपांतर झालं” असं देवेंद्र फडणवीस ‘टीव्ही9 मराठी’शी बातचित करताना म्हणाले.

“मजेची गोष्ट सांगतो, आपल्या महाराष्ट्रातील पत्रकार तिथे भेटला, त्याला फीडबॅक विचारलं. तो म्हणाला मला आश्चर्याची बाब पाहायला मिळाली. काँग्रेस-आरजेडीची सभा होती, त्या सभेमध्ये महिला म्हणत होत्या, आम्ही काँग्रेससोबत होतो, पण मोदींबद्दल श्रद्धा आहे. महिलांनी सर्वाधिक मतदान केलं. एक्झिट पोल जे चुकतात ते यामुळेच. हे सुप्त मतदान आहे. जे बोलत नाहीत, पण मतदान करतात त्यामुळेच एक्झिट पोल चुकतात.” असं निरीक्षण देवेंद्र फडणवीस यांनी नोंदवलं. बहुतांश बिहार एक्झिट पोल्समध्ये एनडीएची सत्ता खालसा होऊन महागठबंधन सरकार येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, मात्र एनडीएला आपली सत्ता राखण्यात यश आलं आहे.

“शिवसेनेची स्थिती तो भी मेरी टांग उपर”

“मला वाटतं की शिवसेनेची परिस्थिती चित हो गयी, तो भी मेरी टांग उपर अशी झाली आहे. मला काही बोलायचं नाही. अनेक लोक ज्यांचं डिपॉझिट वाचलं नाही, नोटापेक्षा कमी मतं मिळाली, त्यांनी आत्मचिंतन करावं. भाजप मोठा पक्ष आहे, केवळ बिहारमध्ये नाही, तर देशात पोटनिवडणुकांमध्ये जनतेने नरेंद्र मोदींवर विश्वास टाकला” याकडे फडणवीसांनी लक्ष वेधलं.

“लॉकडाऊनमध्ये जनता त्रासली होती, सर्व राजकारणी नरेंद्र मोदींवर टीका करत होते, मात्र त्याची पर्वा न करता त्यांनी गरिबांना मदत केली. टीका करणाऱ्यांनी मोदी काय करतात हे पाहून आत्मचिंतन करावं” असा सल्लाही फडणवीसांनी दिला.

“शरद पवार हे मोठे नेते आहेत, मी लहान नेता, मला पहिल्यांदाच राष्ट्रीय राजकारणाची संधी मिळाली. जे करता येईल ते केलं. खऱ्या लढाईच्या वेळी मी आजारी पडलो. पण जे करणं शक्य होतं, ते केलं. लढाई वरच्या टप्प्यात नेऊन ठेवली” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. “राष्ट्रीय पक्ष आणि राज्याचा पक्ष यात फरक असतो. शरद पवारांनी जर राष्ट्रीय पक्ष असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला, तर जनता सर्व पाहात असते” असा टोलाही फडणवीसांनी लगावला. (Devendra Fadnavis shares observation why Bihar Exit Polls went wrong)

“काँग्रेसला आता कोणी विचारायला तयार नाही. काँग्रेसची वेगवेगळ्या राज्यात ज्यांच्याशी आघाडी आहे, त्यांच्या नेतृत्त्वावर विश्वासच ठेवायला तयार नाही. त्यामुळे काँग्रेस खाली खाली जात आहे. राजकारणात जर-तर नाही. जो जिंकला, तो जिंकला, जो हरला तो हरला. सर्व श्रेय मोदी आणि नितीश कुमार यांच्या स्वच्छ चेहऱ्याला” असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

“महाराष्ट्रातील भाजपचा कार्यकर्ता आणि आमच्यावर विश्वास ठेवणारा मतदार यांचा आत्मविश्वास या निकालाने वाढला.. आम्ही योग्य दिशेने चाललो आहोत, हे दिसतं. आम्ही विरोधीपक्षात आहोत. अधिक प्रखरतेने ते मांडणार आहोत. शेतकऱ्यांमध्ये असंतोष, अस्वस्थता आहे. कुणीही मदत करत नाही. मराठी आणि ओबीसी समोरासमोर येण्यासाठी सरकारमधूनच प्रयत्न करत आहेत” असा आरोपही फडणवीसांनी केला.

संबंधित बातम्या :

देवेंद्र फडणवीसांमुळेच बिहारमध्ये चमत्कार झाला, शरद पवारांची मिष्किल टिप्पणी

‘बिहारच्या जनतेला जंगलराज नको तर विकास हवा’, बिहार निवडणूक निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया

(Devendra Fadnavis shares observation why Bihar Exit Polls went wrong)