‘माझ्याशी विश्वासघात केला तर सत्यानाश होतो’, देवेंद्र फडणवीस अकलूजमध्ये कडाडले
"शरद पवार यांनी यांची सगळी दुकानदारी बंद केली होती. संस्था संपल्या होत्या. कारखाना बंद पडले होते. यावेळेस ही मंडळी आमच्याकडे आली. आम्ही विचार केला यांना मदत केली पाहिजे. त्यावेळेस आम्ही यांना जवळ केले", असं देवेंद्र फडणवीस अकलूजमध्ये म्हणाले.
उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज अकलूजमध्ये सभा पार पडली. महायुतीचे माढाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीसांची आज अकलूजमध्ये सभा पार पडली. भाजपमधून राष्ट्रवादी शरद पवार गटात गेलेले धैर्यशील मोहिते पाटील यांचं अकलूजमध्ये चांगलं वर्चस्व आहे. पण मोहिते पाटलांनी आता पुन्हा शरद पवारांची साथ पकडली आहे. विशेष म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील हे महाविकास आघाडीकडून माढाचे उमेदवार आहेत. त्यामुळे माढ्यातील लढत आता चांगलीच चुरशीची आहे. असं असताना आज देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराची सभा अकलूज येथे घेतली. यावेळी त्यांनी नाव न घेता मोहिते पाटलांवर निशाणा साधला.
“शरद पवार यांनी यांची सगळी दुकानदारी बंद केली होती. संस्था संपल्या होत्या. कारखाना बंद पडले होते. यावेळेस ही मंडळी आमच्याकडे आली. आम्ही विचार केला यांना मदत केली पाहिजे. त्यावेळेस आम्ही यांना जवळ केले. कारखान्याला मदत केली, संस्थेला मदत केली. मी जे करतो ते मनाने करतो. तुम्ही धन्यवाद दिले तरी करतो, नाही दिले तरी करतो. तुम्ही जनतेच्या मनातील मोदीजींना काढू शकत नाही. रणजीत सिंह निंबाळकरांनी या भागात पाणी आणण्याचे काम केलं. रेल्वे आणण्याचं काम केलं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘माझ्याशी विश्वासघात केला की, त्याचा सत्यानाश होतो’
“शरद पवार जमलं नाही ते तुम्ही म्हणजेच रणजीत सिंह निंबाळकरांनी दहा वर्षात करून दाखवलं, म्हणून शरद पवारांचा तुमच्यावर राग आहे. मी कोणाच्या नादी लागत नाही. कुणाचे वाईट देखील चिंतत नाही. पण माझ्याशी विश्वासघात केला की, त्याचा सत्यानाश होतो. मोदीजी देशाचे पंतप्रधान नाही झाले तर देशाचे नुकसान होणार आहे. रणजीतसिंह निंबाळकर निवडून आले काय आणि मोहिते निवडून आले काय, मोदीजी पंतप्रधान होणे गरजेचे आहेत. शरद पवारांच्या पक्षाचे अस्तित्व काय? त्यांची फक्त दहा उमेदवार आहेत”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
‘…तर याद राखा’
“सगळ्या पक्षांची आघाडी मिळून आपण एक मोठी मोट मानली आहे. आपली विकासाची गाडी आहे आणि याला नरेंद्र मोदींचे इंजिन लागले आहे. राहुल गांधींचे फक्त इंजिन आहे. त्यांच्यात प्रत्येक जण म्हणतो, मीच इंजिन आहे. इंजिनमध्ये बसायला जागा नसते. फक्त ड्रायव्हर असतो. शरद पवारांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळे यांना जागा आहे. उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये आदित्य ठाकरेंना जागा आहे. 2019 नंतर एकाही दहशतवाद्यांची बॉम्बस्फोट करायची ताकद झाली नाही. हा देश कोणाच्या हातात द्यायचे आहे हे तुम्हीच ठरवा. राहुल गांधी की नरेंद्र मोदी? एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात हे राज्य चालतंय. लोकशाहीचा राज्यात लोकशाहीनेच ही निवडणूक व्हावी. तुम्ही ठोकशाहीच्या जीवावर जर काही लोक लोकशाही संपवत असाल तर याद राखा”, असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला.