
मुंबई : (Shivsena) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय नाट्यावर पडदा पडला आहे. त्यानंतर (BJP) भाजपा गोटात उत्सहाचं भरतं आलं आहे. त्यामुळे जो-तो आपल्या पध्दतीने आनंद व्यक्त करीत असले तरी नितेश राणे यांनी मात्र ट्विटच्या माध्यमातून शिवसेनेला आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला तर त्याचाच आता एकनाथ शिंदे गटाने घेतला असल्याचे (Nitesh Rane) नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सातत्याने शिवसेना आणि नेतृत्वावर जहरी टिका करणाऱ्या नितेश राणे यांनी त्याहून अधिक पटीने आपल्या कडवट भावना यामधून व्यक्त केल्या आहेत.त्यामुळे नितेश राणे यांच्या या ट्विटची सोशल मिडियावर जोरदार चर्चा होत आहे.
विधानसभा 2019 मध्ये शिवसेना-भाजप हे एकत्र लढूनही केवळ मुख्यमंत्री पदावरुन या मित्रपक्षामध्ये काडीमोड झाला होता. त्यावेळी शिवसेनेने भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसून विरोधात असलेल्या राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसबरोबर सत्ता स्थापन केल्याचे सातत्याने भाजपाच्या माध्यमातून सांगितले जात होते. केवळ सत्तेसाठी शिवसेनेने देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसले होते असे नितेश राणे यांनी दाखवले तर दुसऱ्या छायाचित्रामध्ये आता एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे दाखवण्यात आले आहे. सत्ता संघर्ष कसा असू शकते हे दाखवून देण्याचा प्रय़त्न त्यांनी केला आहे.
Return gift pic.twitter.com/tXEd9WA0vC
— nitesh rane (@NiteshNRane) June 30, 2022
2019 च्या निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपशी दगाबाजी केल्याचे दाखवण्यात आले असले तरी भाजपाने असे काही केले नाही. मात्र, सेनेतील नाराज गटानेच काय केले हे दाखवण्याचा राणे यांनी प्रयत्न केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पाठीत भाजपाने नाहीतर शिंदे गटानेच पाठीत खंजीर खुपसल्याचे दाखवण्यात आले आहे. सन 2019 आणि 2022 चे चित्र काय आहे हेच दर्शवण्याचा प्रयत्न नितेश राणे यांनी केला आहे.
राजकीय डावपेच आणि सत्ता संघर्षामध्ये देवेंद्र फडणवीस हेच कसे वरचढ आहेत हे राणे यांच्याकडून दाखवूण देण्याचा प्रयत्न केला जात असतो. राज्यात गेल्या 10 दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय नाट्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच कर्मा ठरले आहेत. बोलक्या छायाचित्राबरोबर कर्मा रिटर्न्स असे म्हणत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे.