मुख्यमंत्री आमदारांसह पुन्हा गुवाहाटीला जाणार; नाथाभाऊ म्हणतात, हा तर प्रेयसीच्या आठवणी…

| Updated on: Nov 17, 2022 | 10:10 AM

या राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिलेली नाही. कसला कायदा? कसली सुव्यवस्था? सर्व सुस्तीत आणि सर्व मस्तीत चालू आहे. तुम्हाला काय करायचे ते करा.

मुख्यमंत्री आमदारांसह पुन्हा गुवाहाटीला जाणार; नाथाभाऊ म्हणतात, हा तर प्रेयसीच्या आठवणी...
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुक्ताईनगर : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. प्रेमाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या 40 आमदारांना घेऊन जाणार आहेत. एक प्रकारे प्रेयसीच्या आठवणी ताज्या करण्याचाच हा प्रकार आहे, अशी खोचक टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे.

मुक्ताईनगरमध्ये अंतुरली गावात सभेला संबोधित करताना एकनाथ खडसे यांनी ही टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 40 आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत. प्रेमाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी शिंदे आपल्या 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीला जाणार आहेत. प्रेमाची जशी आठवण असते तशी प्रेयसीसोबतचीही आठवण असते, असं सांगतानाच भेट तुझी माझी प्रेमाची. अजून त्या दिसाची. झुंजवाऱ्याची. रात्र पावसाची तशी, आपले शिंदे साहेब परत 40 आमदार घेऊन वाट धरताहेत गुवाहाटीची, अशी काव्यमय टीकाही एकनाथ खडसे यांनी केली.

हे सुद्धा वाचा

काय ती झाडी, काय तो डोंगर हे पाहण्यासाठी जात आहेत. आपण आपल्या आठवणी ताज्या करूया असं सांगून आठवणी ताज्या करण्यासाठी शिंदे आमदारांना घेऊन जात आहेत, असंही ते म्हणाले.

या राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिलेली नाही. कसला कायदा? कसली सुव्यवस्था? सर्व सुस्तीत आणि सर्व मस्तीत चालू आहे. तुम्हाला काय करायचे ते करा. पण दोन रुपये किलोचे धान्य तरी द्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवा. सर्वात जास्त आत्महत्या तीन महिन्यात झाल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी भाजपचे नेते, मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही टीका केली. माझ्या मुलीला तिकीट दिलं आणि व्यवस्था काय केली तर पाडण्याची, हे मी सांगत नाही तर विद्यमान मुख्यमंत्री मुक्ताईनगरमध्ये येऊन स्वतः सांगत आहेत.

मुक्ताईनगरमध्ये आमदार चंद्रकांत पाटील निवडून आले. पाटील यांना निवडून आणण्यात सर्वात मोठा सिंहाचा वाटा गिरीश महाजनांचा आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांनीच गद्दारी केली अशी पावतीच मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 18 नोव्हेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे दाखल होणार आहे. या यात्रेत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे आजी-माजी मंत्री सहभागी होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.