Eknath Shinde : आजपासून विधीमंडळाचं विशेष अधिवेशन, विधानसभा अध्यक्षांची निवड, विश्वासमत, शिंदे सरकारचा 2 दिवसांचा कार्यक्रम, एका क्लिकवर

| Updated on: Jul 03, 2022 | 6:15 AM

उद्या या नव्या सरकारला बहुमत चाचणीचीही कसोटी पार करावी लागणार आहे. त्यातच आता व्हीपवरून दोन्ही बाजुने दावे प्रतिदावे केले जात असल्याने पुढे काय होणार? याचा अंदाज हा भल्या भल्या राजकीय पंडितांनाही लागेना झालाय. 

Eknath Shinde : आजपासून विधीमंडळाचं विशेष अधिवेशन, विधानसभा अध्यक्षांची निवड, विश्वासमत, शिंदे सरकारचा 2 दिवसांचा कार्यक्रम, एका क्लिकवर
आज शिंदे सरकारची बहुमत चाचणी
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : दोन दिवसांपूर्वीच राज्यात सर्वात मोठा सत्ताबदल (Maharashtra Political Crisis) घडून आलाय. अडीच वर्षांचं ठाकरे सरकार (Uddhav Thackerya) गेलं आणि आता शिंदे-भाजप (Eknath Shinde) सरकार आलं. या सरकारसाठी आजचा आणि उद्याचा दिवस हा अत्यंत महत्वाचा असणार आहे. कारण आजपासून विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू होणार आहे. या दोन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला अनेक परीक्षा पास कराव्या लागणार आहेत. शिंदे सरकारसाठी प्रत्येक पेपर हा कसोटी ला आहे. आज विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. तर उद्या या नव्या सरकारला बहुमत चाचणीचीही कसोटी पार करावी लागणार आहे. त्यातच आता व्हीपवरून दोन्ही बाजुने दावे प्रतिदावे केले जात असल्याने पुढे काय होणार? याचा अंदाज हा भल्या भल्या राजकीय पंडितांनाही लागेना झालाय.

आजपासून विधीमंडळाचे विशेष अधिवेशन

ठाकरे सरकार हे एकनाथ शिंदे यांच्या धक्क्यानं पायउतार झाल्यानंतर हे विशेष अधिवेशन बोलवण्यात आलंय. या अधिवेशानात विविध मुद्द्यांवरून विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे अधिवेशन हे सर्वात वादळी अधिवेशन ठरणार असं चित्र सध्या तरी दिसतंय.

आज विधानसभा अध्यक्षांची निवड

गेल्या अनेक महिन्यांपासून विधानसभा अध्यक्षांचं पद हे रिक्त आहे. नाना पटोले हे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी गेल्याने त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने अनेकदा हे पद भरण्याचा प्रयत्न केला. मात्र राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार वादामुळे आणि कायदेशीर पेचामुळे हे पद भरता आले नाही. आता बहुमताने आकडे फिरल्याने पुन्हा विधानसभा अध्यक्षांच्या निवडीने जोर धरला आहे.

कोण होणार विधानसभा अध्यक्ष?

भाजप आणि शिंदे गटाच्या युतीने नवं सरकार स्थापन झालं आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा हा सध्या तरी याच सरकारकडे आहे. त्यामुळे आमचाच विधानसभा अध्यक्ष होणार असा दावा भाजपकडून करण्यात आलाय. यासाठी भाजपने राहुल नार्वेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर महाविकास आघाडीकडूनही शिवसेनेच्या राजन साळवी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय. आम्ही व्हीप जारी करणार त्यामुळे शिंदे गटाला आम्हालाच मतदान करावे लागणार आणि माझा विजय निश्चित होणार असा दावा साळवीही करत आहे. त्यामुळे हाही पेच आजच सुटणार आहे.

सोमवारी बहुमतही सिद्ध करावं लागणार

तर सोमवारीच या सरकारला बहुमतही सिद्ध करावं लागणार आहे. आमच्याकडे 171 आमदारांचा आकडा आहे, त्यामुळे आम्ही बहुमत चाचणी सहज पार करू असे एकनाथ शिंदे सांगत आहेत. तर विधानसभेत आल्यावर अनेक आमदारांचं मत बदलू शकतं असे सूचक विधान शरद पवार यांनी केलं आहे. त्यामुळे ही सुद्धा सरकारसाठी मोठी अग्निपरीक्षाच ठरणार आहे.

कुणाकडे किती आमदारांचा आकडा?

भाजपकडे सध्या 106, तर शिंदे गटाकडे 50 आमदरांचं संख्याबळ आहे. तर काही जणांचा या युतीला बाहेरून पाठिंबाही आहे. त्यातून संख्याबळ 170 पर्यंत जाईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे सध्या केवळ 16 आमदार उरले आहेत. तर काँग्रेसकडे 44 आमदार, तसेच राष्ट्रवादीकडे 53 आमदार आहेत. या सर्व आकड्याची बेरीज मारल्यास महाविकास आघाडीचा आकडा हा 113 पर्यंत जात आहेत. यात काही अपक्षांचाही पाठिंबा यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याचा आकड्याचा खेळ तर भाजप आणि शिंदेंच्या युतीकडे दिसतोय.