नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु झाले आहे. निवडणुकीत पराभव झाल्याने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. यावेळी माजी अर्थमंत्री पी. चिंदबरम हे भावूक झाले. “राहुल गांधीनी पक्षाच्या पदावरुन राजीनामा देऊ नये, राहुलने राजीनामा दिल्यास काँग्रेसचे कार्यकर्ते आत्महत्या करतील”, अशी प्रतिक्रिया पी चिदंबरम यांनी दिली आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव स्विकारावा लागला. महाराष्ट्रात काँग्रेसला केवळ एका जागा मिळाली आहे. तर देशात काँग्रेसला केवळ 52 जागांवर समाधान मानावे लागलं आहे. या पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस कमिटीकडे अध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला. या राजीनाम्यानंतर अनेकांना त्यांना परत घेण्याची मागणी केली.
यावेळी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत काँग्रेस नेते पी चिंदबरम यांनी राहुल गांधींना समजवण्याचा प्रयत्न केला. यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पक्षाच्या पदावरुन राजीनामा देऊ नये अशी विनंती केली. “राहुल यांनी असे केल्यास दक्षिण भारतातील काँग्रेस कार्यकर्ते आत्महत्या करतील असे पी चिदंबरम म्हणाले.” राहुल गांधींनी पदावर राहण्याची विनंती करताना चिदंबरम थोडे भावूक झाले. यानंतर अनेक वरिष्ठ नेत्यांनी राहुल गांधीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा काँग्रेस कार्यकारिणीकडे सोपवला. मात्र काँग्रेस कमिटीने तो फेटाळला. त्याशिवाय राहुल यांना पक्षातील सुधारणांचे सर्वाधिकार दिले आहेत. राजीनामा द्यायचा की नाही, हा राहुल यांचाच निर्णय असेल, अशी भूमिका बैठकीत सोनिया गांधी यांनी घेतली. तर राहुल यांनी राजीनामा दिल्यास ते भाजपच्या जाळ्यात अडकण्यासारखे ठरेल, अशी भूमिका प्रियांका गांधी यांनी मांडली.