सांगली : MPSC आयोगामार्फत राज्यातील भरल्या जाणाऱ्या जागांमध्ये बिंदू नामावलीनुसार धनगर समाजाला 3.5 टक्के आरक्षित जागा द्या. बिंदू नामावलीनुसार धनगर समाजातील विद्यार्थ्यांना जागा दिल्या नाहीत तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार, असा इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिलाय. पीएसआयच्या भरतीत अवघ्या तीनच जागा दिल्याने धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी एमपीएससी आयोगाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर आता पडळकर सरकारवर तुटून पडल्याचं पाहायला मिळत आहे. (Gopichand Padalkar’s warning to Mahavikas Aghadi government)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रशासनावर वचक नाही. मुख्यमंत्री निकामी आणि प्रशासनही निकामी आहे. सामान्य प्रशासन विभाग आणि समाज कल्याण विभागाचे मंत्री झोपा काढत आहेत का? असा खोचक सवालही गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे. बिंदू नामावलीनुसारचं धनगर समाजाच्या जागा भरा अशी मागणी पडळकर यांनी केली आहे, अन्यथा आंदोलनाचा इशाराही पडळकर यांनी दिलाय.
एमपीएससी आयोग धनगर आणि वंजारी समाजाला आरक्षणानुसार जागा देत नाही. त्यामुळे धनगर समाजातील मुलांवर अन्याय होत असल्याची विद्यार्थ्यांची भावना आहे. 2020च्या एमपीएससी आणि पीएसआय पदांच्या भरतीत धनगर समाजाला अवघ्या तीन जागा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे आयोगाने आरक्षणानुसार जागा भराव्यात, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा विद्यार्थ्यांनी केला आहे. एनटीडी आणि एनटीसी जागा आरक्षणानुसार द्या, अशी मागणीही या विद्यार्थ्यांनी केली आहे.
दरम्यान, एमपीएससी आयोगावर नेमण्यात आलेले नवनिर्वाचित तीनही सदस्य हे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाचे आहेत, असा आरोप करत आघाडी सरकारने विदर्भाचे आणि ओबीसी समाजाचे सदस्य पॅनेलवर घ्यावेत, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांनी केली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पॅनेलवरील काही जागा रिक्त होत्या. त्या जागांवर राज्य सरकारने नियुक्त्या केल्या आहेत. पण पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाचे सदस्य शासनाने पॅनेलवर घेतले आहेत, असा आरोप बबनराव तायवाडे यांनी केला होता. MPSC पॅनेलवर विदर्भातील ओबीसी सदस्य घ्या, केवळ पश्चिम महाराष्ट्रातील मराठे नकोत, असं त्यांनी म्हटलं होतं.
इतर बातम्या :
मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्रावर ढकलण्याचा ‘टाईमपास’ आता बंद करा, उदयनराजेंचा घणाघात
राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक, बीडीडी चाळीतील रहिवाशांना दिलासा, अजून कोणते महत्वाचे निर्णय?
Gopichand Padalkar’s warning to Mahavikas Aghadi government