राहुल गांधींची भारत जोडो यात्रा थांबणार? हरियाणाचे मुख्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या सूचना काय?

| Updated on: Dec 21, 2022 | 11:54 AM

केंद्र सरकार नव-नवी कारणं शोधून भारत जोडो यात्रेत अडथळे आणण्याचा प्रयत्न करतंय, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा थांबणार? हरियाणाचे मुख्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या सूचना काय?
Image Credit source: social media
Follow us on

नवी दिल्लीः चीनमध्ये कोरोनाचा (China Corona) नव्याने झालेला उद्रेक पाहता भारताने सावधगिरीची भूमिका घेतली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo) कोरोना नियमांचे पालन होत नसेल तर ही यात्रा स्थगित करण्यात यावी, अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राहुल गांधींना दिल्या आहेत. भारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी सध्या राजस्थानात आहेत. मांडविया यांनी काल देशातील सर्वच राज्यांना कोरोना नियम पालनासंदर्भात पत्र लिहिले. त्यात राहुल गांधी तसेच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनाही पत्र लिहिले.

भारत जोडो यात्रेत कोरोना गाइडलाइन्सचे कठोर पालन होत नसेल तर, कोविड प्रोटोकॉलचे पालन होत नसेल तर भारत जोडो यात्रा स्थगित करण्यात यावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

राजस्थानचे खासदार पीपी चौधरी, निहाल चंद, देवजी पटेल यांनी आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांना पत्र लिहून भारत जोडो यात्रेतील कोरोना संसर्गासंबंधी चिंता व्यक्त केली होती. देशात मागील काही दिवास कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या राजस्थानात आहे. देशातील विविध राज्यांतील लोक यात सहभागी आहेत. इतर राज्यांतून आलेल्या प्रवाशांमुळे राजस्थानमध्ये कोरोनाचा फैलाव होवू शकतो.

भारत जोडो यात्रेत सहभागी सदस्यांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळत आहेत. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्खूदेखील यात्रेतून परतल्यावर कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे खबरदारी बाळगण्याची गरज असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा पत्रात लिहिले आहे.

मोदी गुजरातेत मास्क लावून गेले होते का?

दरम्यान, सरकारचा हा नाहक कांगावा असल्याची टीका काँग्रेसकडून होतेय. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे मोदी सरकार घाबरले आहे. सामान्य नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजप अशा प्रकारे प्रश्न उपस्थित करत आहे. गुजरात निवडणुकांमध्ये मोदी घरोघरी मास्क लावून गेले होते का? असा सवाल काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केलाय.

संजय राऊतांचीही टीका

तर, केंद्र सरकार नव-नवी कारणं शोधून भारत जोडो यात्रेत अडथळे आणण्याचा प्रयत्न करतंय, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही केला आहे.