पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड नाही? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्र्यांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा?

| Updated on: Jun 29, 2021 | 9:54 PM

बैठकीत पक्षाच्या संघटनवाढीबाबत चर्चा झाल्याचं मलिक यांनी सांगितलं. त्याचबरोबर महामंडळ वाटप, विविध शासकीय कमिट्यांवरील नियुक्तांबाबतचा निर्णय पावसाळी अधिवेशनानंतर केला जाईल. त्यासाठी महाविकास आघाडीतील तिनही पक्ष एकत्र बसून चर्चा करतील असं मलिक यांनी सांगितलं.

पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड नाही? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्र्यांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा?
राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्र्यांची महत्वपूर्ण बैठक
Follow us on

मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक आज पार पडली. या बैठकीत पावसाळी अधिवेशनातील मुद्दे, महामंडळ वाटप, विधानसभा अध्यक्ष निवडणूक, अनिल देशमुख ईडी चौकशी आदी प्रकरणावर चर्चा झाली. तशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्र्यांमध्ये जवळपास 2 तास चर्चा झाली. (important meeting of NCP leaders and ministers)

प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, मंत्री धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री जितेंद्र आव्हाड, मंत्री नवाब मलिक यांच्यासह महत्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत पक्षाच्या संघटनवाढीबाबत चर्चा झाल्याचं मलिक यांनी सांगितलं. त्याचबरोबर महामंडळ वाटप, विविध शासकीय कमिट्यांवरील नियुक्तांबाबतचा निर्णय पावसाळी अधिवेशनानंतर केला जाईल. त्यासाठी महाविकास आघाडीतील तिनही पक्ष एकत्र बसून चर्चा करतील असं मलिक यांनी सांगितलं.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कधी?

विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेण्याची मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. मात्र, सर्व आमदारांच्या कोरोना चाचणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच अध्यक्षपदाची निवडणूक घेतली जाईल, असं मलिक यांनी स्पष्ट केलंय. त्याचबरोबर महाविकास आघाडीत कुठलाही वाद नाही. तिनही पक्षात समन्वयाने काम सुरु आहे. भाजप संभ्रम निर्माण करण्याचं काम करतेय. त्यांच्या बोलण्यात कुठलंही तथ्य नाही. पावसाळी अधिवेशनात भाजपच्या प्रत्येक प्रश्नाला आम्ही उत्तर देण्यासाठी तयार आहोत, असा इशाराही मलिक यांनी भाजप नेत्यांना दिलाय.

राष्ट्रवादी काँग्रेस देशमुखांच्या पाठीशी

अनिल देशमुख पक्षाचे नेते आहे. परमबीर सिंग यांनी बदली झाल्यावर त्यांच्यावर आरोप केला आहे. केंद्र सरकारच्या दबावाखाली काही अधिकारी काम करत आहेत. सीबीआय, ईडीचा तपास ज्या प्रकारे सुरु आहे, यावरुन हे दिसतं की त्यांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे अनिल देशमुख यांच्या पाठीशी असल्याचंही मलिक याांनी यावेळी सांगितलं.

शरद पवार, मुख्यमंत्री ठाकरेंचीही बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. त्यावर आता पडदा पडल्याचं सांगितलं जात आहे. कारण, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मातोश्री, वर्षा आणि सिल्व्हर ओक या बंगल्यांच्या फेऱ्या मारल्यानंतर आज वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची बैठक पार पडली. या दोन्ही नेत्यांमध्ये या बैठकीत जवळपास 1 तास चर्चा झाली. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा एकदा सुसंवाद सुरु झाल्याचं आता बोललं जात आहे. तर दुसरीकडे पवार आणि ठाकरे यांच्या बैठकीत तीन महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचंही सांगितलं जात आहे. त्यात महामंडळ वाटप, कोरोना स्थिती आणि निर्बंध, विधानसभा अध्यक्ष निवडणूक या मुद्द्यांचा समावेश होता.

संबंधित बातम्या :

शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘वर्षा’वर तासभर खलबतं, कोणत्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा?

शिवसेनेचा मोठा निर्णय, सर्व आमदारांना व्हिप जारी

important meeting of NCP leaders and ministers