‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीत वाटाघाटीत व्यग्र, दुसरीकडे राज्य अपंगावस्थेत’, जयंत पाटलांचा शिंदे, फडणवीसांवर निशाणा

| Updated on: Jul 26, 2022 | 4:17 PM

जे लोकं जीवाभावाची शिवसेना सोडून गेले आहेत, त्यामुळे तिथे फलप्राप्ती झाल्याशिवाय ते गप्प बसतील असं वाटत नाही. त्यामुळे मतभेदाची जास्त शक्यता असल्याचा टोलाही पाटील यांनी लगावलाय.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीत वाटाघाटीत व्यग्र, दुसरीकडे राज्य अपंगावस्थेत, जयंत पाटलांचा शिंदे, फडणवीसांवर निशाणा
जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : गुवाहाटीतील वस्तीचे दिवस आणि आतापर्यंतचे दिवस पाहिले तर दोन महिने झाले मुख्यमंत्री (Chief Minister) आणि उपमुख्यमंत्री दिल्लीतील वाटाघाटीत व्यस्त आहेत. दुसरीकडे राज्याला अपंग करुन सोडलंय, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलीय. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात जयंत पाटील आले असता माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी शिंदे सरकारवर (Shinde Government) हल्लाबोल केला. राज्यात मंत्रीमंडळाचा विस्तार का करत नाही? ज्याअर्थी विस्तार करत नाही त्याअर्थी त्यांच्यात मतभेद आहेत. जे लोकं जीवाभावाची शिवसेना सोडून गेले आहेत, त्यामुळे तिथे फलप्राप्ती झाल्याशिवाय ते गप्प बसतील असं वाटत नाही. त्यामुळे मतभेदाची जास्त शक्यता असल्याचा टोलाही पाटील यांनी लगावलाय.

‘राज्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असे दोनच मंत्री’

राज्यातील गोरगरीबांचे प्रश्न आज सुटण्याऐवजी वाढायला लागले आहेत. राज्यात पुरपरिस्थिती गंभीर आहे. पुरामुळे सामान्य नागरिक हैराण झाला आहे. त्या भागात पालकमंत्री नाहीत. राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असे दोनच मंत्री आहेत. अशास्थितीतही त्यांच्यातील गुंता सोडवण्यातच त्यांचा जास्त काळ जात असल्याची खोचक टीका पाटील यांनी शिंदे आणि फडणवीसांवर केलीय.

‘मंत्री नसल्याने राज्यात दयनीय स्थिती’

राज्यात पुरपरिस्थिती असल्याने जनता हवालदिल झाली आहे. हे लोक पावसाळा संपेपर्यंत थांबले असते तर आमचे आघाडीतील मंत्री तिथे ठाण मांडून बसले असते आणि मोठी मदत लोकांना झाली असती. महाराष्ट्रात मंत्री नसल्याने जिल्हया- जिल्हयात दयनीय अवस्था झाली आहे आणि हीच अवस्था लोकांना चिंता करायला लावणारी आहे, अशी टीकाही पाटील यांनी शिंदे सरकारवर केलीय.

सोनिया गांधी यांच्या चौकशीत मानवतावादी दृष्टीकोन ठेवायला हवा

सध्या ईडी, सीबीआय, आयटी मार्फत चौकशी होणे हे नित्याचे झाले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या देशातील मोठ्या नेत्या आहेत. त्यांचे वय पाहता, प्रकृती पाहता ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जावून चौकशी करायला हवी होती. राजकारण होत राहील मात्र मानवतावादी दृष्टिकोन ठेवायला पाहिजे, असंही जयंत पाटील म्हणाले.