आमच्या परिस्थितीची कल्पना होतीच, भाजपला काय झालं? : कमलनाथ

| Updated on: Feb 11, 2020 | 1:00 PM

मी पक्षाच्या कामगिरीची जबाबदारी घेतो, आम्ही यामागील कारणांचे विश्लेषण करु, अशी प्रतिक्रिया दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुभाष चोप्रा यांनी दिली

आमच्या परिस्थितीची कल्पना होतीच, भाजपला काय झालं? : कमलनाथ
Follow us on

नवी दिल्ली : आमच्या परिस्थितीची आम्हाला कल्पना होतीच, पण भाजपला काय झालं? असा खोचक प्रश्न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ (Kamalnath on BJP Delhi Results) यांनी विचारला आहे. तर काँग्रेसच्या दिल्ली प्रदेशाध्यक्षांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे.

आम्हाला आमच्या परिस्थितीची कल्पना होतीच, पण प्रश्न असा आहे, की मोठमोठे दावे करणाऱ्या भाजपला काय झालं? असा प्रश्न कमलनाथ यांनी ‘एएनआय’शी बोलताना उपस्थित केला. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा एकदा भोपळा मिळाला आहे.

दरम्यान, मी पक्षाच्या कामगिरीची जबाबदारी घेतो, आम्ही यामागील कारणांचे विश्लेषण करु, अशी प्रतिक्रिया दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुभाष चोप्रा यांनी दिली आहे. ‘दिल्लीकरांनी साथ दिली, काँग्रेस कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊनही पराभव झाल्याने कारणांचं विचारमंथन करु. आमच्या मतदानाची टक्केवारी कमी होण्याचे कारण भाजप आणि आप या दोन्ही पक्षांनी केलेलं ध्रुवीकरणाचं राजकारण’ असा आरोपही चोप्रांनी केला.

‘आप’कडून सत्ता खेचून आणण्यात भाजपला अपयश आलं आहे. तर काँग्रेसचा पुन्हा सुपडासाफ झाला आहे. आप 56, तर भाजप 14 जागांवर आघाडीवर आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकांचे अंतिम निकाल हाती आल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे.

पूर्ण बहुमत मिळालेल्या आम आदमी पक्षाचं सरकार तिसऱ्यांदा सत्तेत येणार हे निश्चित आहे. अरविंद केजरीवाल हे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची हॅट्ट्रिक करणार आहेत.

‘सीएए’विरोधी आंदोलन झालेल्या शाहीन बागमध्ये कोण आघाडीवर?

दिल्ली काबीज करण्यासाठी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात दिल्लीचे भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा या त्रिकूटाचीही प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.

भाजपने तीनशे खासदारांसह 11 राज्यांतील मुख्यमंत्र्यांना दिल्लीतील प्रचाराच्या मैदानात उतरवलं होतं. महाराष्ट्रातील भाजपच्या माजी मंत्र्यांची फौजही प्रचारात उतरली होती. वीस वर्षांपासून सत्तेबाहेर असलेलं भाजप सत्ता मिळवण्यासाठी आसुसलं आहे.

2015 मध्ये ‘आप’ने 70 पैकी 67 जागा जिंकत भाजप आणि काँग्रेसला क्लीन स्वीप दिला होता. भाजपला अवघ्या तीन जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता. काँग्रेसने सलग दुसऱ्यांदा शून्य मिळवलं आहे. विशेष म्हणजे आप सत्तेत येण्यआधी काँग्रेस सातत्याने 15 वर्षे सत्तेत होतं.

Kamalnath on BJP Delhi Results