ना आमदार, ना नगरसेवक, तरीही ‘वर्षा’वर शिवसेना प्रवेश, मनसेला खिंडार पाडणारे राजेश कदम कोण?

| Updated on: Feb 01, 2021 | 6:51 PM

राजेश कदम (Rajesh Kadam) हे ना आमदार आहेत, ना नगरसेवक, तरीही  थेट मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षावर त्यांचा पक्षप्रवेश झाला.

ना आमदार, ना नगरसेवक, तरीही वर्षावर शिवसेना प्रवेश, मनसेला खिंडार पाडणारे राजेश कदम कोण?
राजेश कदम यांचा शिवसेनेत प्रवेश
Follow us on

मुंबई : शिवसेनेने कल्याण डोंबवली महापालिका (KDMC Election) निवडणुकीपूर्वी शिवसेनेने मनसेला मोठा धक्का दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम (MNS Rajesh Kadam joins Shiv Sena) यांच्यासह डोंबिवलीतील असंख्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजेश कदम हे ना आमदार आहेत, ना नगरसेवक, तरीही  थेट मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षावर राजेश कदम यांचा पक्षप्रवेश झाल्याने, राजेश कदम यांची कल्याण डोंबिवलीत किती ताकद असू शकते, याचा अंदाज बांधता येईल. साहजिकच राजेश कदम यांच्या शिवसेना प्रवेशाने मनसेला मोठा फटका बसणार आहे.

कल्याण डेंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेचे संस्थापक सदस्य आणि प्रदेश उपाध्यक्ष, डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. राजेश कदम यांच्यासोबत दीपक भोसले, सागर जेढे, कल्याण ग्रामीणचे माजी तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील यांनी शिवबंधन बांधल्याने, मनसेला खिंडार पडलं.

राजेश कदम हा चर्चेत असणारा चेहरा आहे. सत्ताधाऱ्यांवर नेहमी आसूड ओढणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. राजेश कदम यांनी 2009  मध्ये डोंबिवली विधानसभा निवडणूक लढविली होती. 2015 मध्ये महापालिका निवडणुकीतही त्यांनी नशीब आजमावलं होतं, मात्र त्यांचा पराभव झाला होता. शिवसेनेला नेहमी धारेवर धरणारे नेते अशी राजेश कदम यांची ओळख.

राजेश कदम यांच्या प्रवोशामागे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी राजकीय खेळी आहे.  त्यांनी विरोधी पक्षातील बडा नेता फोडून, मनसेची हवाच गुल केल्याची चर्चा कल्याण डोंबिवलीत आहे. जितके कार्यकर्ते शिवसेनेत गेले आहे ते मनसेचे कट्टर कार्यकर्ते होते, स्थापनेपासून ते मनसेत होते. मात्र आता हेच कार्यकर्ते शिवसेनेत गेल्याने, मनसेला मोठा धक्का आहे.

शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय खेळी ही निवडणुकीच्या तोंडावर सरशी ठरते, की नाही हे येत्या काळात पाहावं लागणार आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

“जे शिवसेनेत आले आहेत त्यांचं सर्वांचं स्वागत. शिवसेनेची ताकद कल्याण डोंबिवलीत आहेच ती आता अधिक वाढते आहे. महाराष्ट्रातही ही ताकद वाढत आहे. शिवसेनेच्या भगव्या खाली एकत्र येत आहेत. या सर्वांच्या आशा आकांक्षा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी वाव या सर्व तरुणांना दिला जाईल”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

VIDEO : राजेश कदम यांच्या प्रवेशावेळी मुख्यमंत्री काय म्हणाले?

संबंधित बातम्या 

कल्याण डोंबिवली निवडणुकीपूर्वी मनसेला खिंडार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बडे नेते शिवसेनेत