‘…मग मुख्यमंत्र्यांना माहिती तरी काय असतं?’ भाजप प्रवक्त्यांचा खोचक सवाल

| Updated on: Sep 21, 2021 | 6:10 PM

राज्याचा प्रमुख असलेल्या व्यक्तीला मग नेमकं काय माहित असतं, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा प्रदेश सचिव दिव्या ढोले यावेळी उपस्थित होते.

...मग मुख्यमंत्र्यांना माहिती तरी काय असतं? भाजप प्रवक्त्यांचा खोचक सवाल
उद्धव ठाकरे, केशव उपाध्ये
Follow us on

मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती मुख्यमंत्र्यांना नव्हती, असं राज्याच्या गृहमंत्र्यांकडून, शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. राज्याचा प्रमुख असलेल्या व्यक्तीला मग नेमकं काय माहित असतं, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा प्रदेश सचिव दिव्या ढोले यावेळी उपस्थित होते. (Keshav Upadhye criticizes CM Uddhav Thackeray over Police action on Kirit Somaiya)

उपाध्ये यांनी सांगितले की, ‘किरीट सोमैय्या हे भ्रष्टाचाराची तक्रार करण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना रोखले. सोमैय्या यांना स्थानबद्ध करण्यात आल्याच्या प्रकाराची मुख्यमंत्र्यांना माहितीच नव्हती असा खुलासा शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांना सोमैय्या यांना रोखण्यात आल्याच्या घटनेची कल्पना नव्हती असे स्पष्ट केले आहे. एवढ्या महत्वाच्या घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांना नव्हती तर मुख्यमंत्र्यांना नेमकं काय माहिती असतं असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे.’

राज्यातील विविध घटनांवरुन मुख्यमंत्र्यांवर घणाघात

‘राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी कळस गाठला आहे. या घटनांचीही मुख्यमंत्र्यांना माहिती नसावी. निसर्ग चक्रीवादळाची भरपाई कोकणवासीयांना मिळाली की नाही याची माहिती मुख्यमंत्र्यांना नव्हती. असे असेल तर राज्याचे सरकार चालविते तरी कोण असा प्रश्न उपाध्ये यांनी केला. राज्यातील जनतेच्या प्रश्नांची मुख्यमंत्र्यांना माहिती नसते. मात्र स्वतः वर झालेल्या टीका टिप्पण्णीची त्यांना व्यवस्थित माहिती असते. त्यांच्यावर टीका करणाऱ्या कंगना राणावत, अर्णव गोस्वामी, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सरकारने तातडीने कशी कारवाई केली हे उभ्या महाराष्ट्राने पहिले आहे. हीच तत्परता सामान्य माणसाच्या प्रश्नांबाबतही दाखवा, असा टोलाही उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांना लगावलाय.

मुनगंटीवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नाव राज्यपालांनी लिहिलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलंय. मुख्यमंत्र्यांच्या पत्रावरुन आता भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहे. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या पत्रावरुन मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला लगावलाय. ‘राज्यपालांनी अधिवेशन घ्या असा सल्ला दिल्यानंतर केंद्राकडे बोट दाखवणे म्हणजे असंगाशी संग आहे. राज्यपालांची सूचना शिरोधार्ह मानून त्यावर अंमल करत देशाला मार्ग दाखविण्याची ही वेळ होती. साकीनाका संदर्भात आपण केलेल्या उपाययोजना पाहून, मग देशाला उत्तम काम दाखवून संसदेचे अधिवेशन घ्या, अशी भूमिका मांडता आली असती. साकीनाका प्रकरणी असंवेदनशीलतेनं दुसरीकडे बोट दाखवू नका. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युती तोडून महाविकास आघाडी स्थापन केली. मात्र, त्यांनी आता नीतीची तरी साथ सोडू नये’, अशी खोचक टीका मुनगंटीवार यांनी केलीय.

इतर बातम्या :

‘युनियन मुक्त एसटी कर्मचारी’, भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा नारा

‘हा तर असंगाशी संग, ठाकरेंनी नितीची तरी साथ सोडू नये’ मुनगंटीवारांचा खोचक टोला

Keshav Upadhye criticizes CM Uddhav Thackeray over Police action on Kirit Somaiya