Raj Thackeray On Ketaki Chitle: राज्यसरकारनं ह्याचा नीट छडा लावून, केतकी चितळेच्या पोस्टवर राज ठाकरेंची पहिली अन् सविस्तर प्रतिक्रिया

| Updated on: May 14, 2022 | 4:31 PM

राज ठाकरेंनी केतकी चितळेला कोणीही महाराष्ट्राची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये, हीच अपेक्षा, अशी पोस्ट करत इशारा दिला आहे.

Raj Thackeray On Ketaki Chitle: राज्यसरकारनं ह्याचा नीट छडा लावून, केतकी चितळेच्या पोस्टवर राज ठाकरेंची पहिली अन् सविस्तर प्रतिक्रिया
राज्यसरकारनं ह्याचा नीट छडा लावून, केतकी चितळेच्या पोस्टवर राज ठाकरेंची पहिली अन् सविस्तर प्रतिक्रिया
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : शुक्रवारी केतकी चितळेने (Ketaki Chitle) पुन्हा शरद पवारांबद्दल (Sharad Pawar) एक वादग्रस्त पोस्ट केली आणि त्यानंतर राज्यात पुन्हा यावरून राजकीय घमासान सुरू झालं. त्यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. राज ठाकरेंनी केतकी चितळेला कोणीही महाराष्ट्राची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये, हीच अपेक्षा, अशी पोस्ट करत इशारा दिला आहे. केतकी चितळेच्या या पोस्टवरून सध्या राष्ट्रवादीही (NCP) चांगलीच आक्रमक झाली आहे. केतकी चितळेविरोधात अनेक ठिकाणी गुन्हेही दाखल झाले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली पाटील यानी केतकी चितळेला चोप देऊ असा इशाराही दिला आहे. तर केतकी चितळेवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात येत आहे. आणि आता महाराष्ट्राटाला एक मोठी राजकीय परंपरा आहे. त्यामुळे ती कायम राहवी अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

राज ठाकरेंची पूर्ण प्रतिक्रिया

कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी श्लोकांसारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे असं नाव टाकलं आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.

महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्षे कार्यरत असलेल्या शरद पवारांविरुध्द तिनं किंवा त्या भावेनं हे लिहिणं साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो, त्यातली विनोदबुध्दीही आपण ओळखतो.. तशा टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत… आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरूर आहेत आणि रहातील, परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे इथे फार स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. असं लिहिणं ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे, तिला वेळीच आवर घालायला पाहिजे.

चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं हेच आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या महापुरुषांनी, संतांनी तसेच असंख्य बुद्धीमान विचारवंतानी आपल्याला शिकवलं! कोणीही ह्या राज्याची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये हीच अपेक्षा!

पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्ती ह्या खरंच आहेत की नवा वाद उकरून काढण्यासाठी कोणाची तरी उठाठेव सुरू आहे हे देखील तपासणे गरजेचे आहे! कारण ह्या अशाच चार-दोन विकृत टाळक्यांमुळे समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होते, समाज दुभंगतो. द्वेषाची पातळी किती खालपर्यंत आली आहे हे आता राज्यकर्त्यांनाही समजलं असेलच. हे सगळं महाराष्ट्रात वेळीच आवरणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. म्हणूनच, राज्य सरकारनं ह्याचा नीट छडा लावून ह्या गोष्टींचा ताबडतोब बंदोबस्त करावा.