मुंबई – महाराष्ट्रात (Maharashtra) मागच्या तीन दिवसांपासून राजकारण एका वेगळ्या वळणार गेलं आहे. मागच्या तीन दिवसांपासून महाविकास आघाडीच्या (MVA) तीन पक्षांमध्ये वारंवार बैठका होत आहे. त्यामुळे हे सरकार राहणार की पडणार अशी देखील चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून महाराष्ट्रात राजकीय वातावरण अधिक तापलं आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही अटी घातल्या आहेत. त्या अटी मान्य नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपलं सरकारी निवासस्थान काल रात्री उशिरा सोडलं आहे. तेव्हापासून कॉंग्रेस राष्ट्रवादीमध्ये सतत बैठका होत आहेत. काही वेळात राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे महत्वाचे नेते ट्रायडेंट हॉटेलला दाखल होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, रोहित पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह अनेक आमदार ट्रायडेंट हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीतील अन्य नेते देखील लवकरचं तिथं पोहोचणार आहेत अशी माहिती मिळाली आहे. आजच्या होणाऱ्या घडामोडीत राजकीय निर्णय होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या आमदारांना संपर्क साधला असून सगळे आमदार आमच्यासोबत आहेत असा दावा राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांनी केला आहे. तसेच सगळ्या आमदारांना आज मुंबईत बोलावल्याची माहिती मिळाली आहे. दुपारी राष्ट्रवादीची बैठक झाल्यानंतर जयंत पाटील यांनी आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत आहोत. त्याचबरोबर सरकार टिकवण्याचा आमचा प्रयत्न आहे. अजूनही सरकार स्थिर आहेय. शिवसेनेचा अंतर्गत वाद आहे, त्यामुळे त्यावर बोलणं योग्य ठरणार नाही जयंत पाटील यांनी सांगितलं.
काँग्रेसचे सगळे आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील आम्ही सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत. 44 आमदारांशी आम्ही सतत संपर्क साधत आहोत. सध्या झालेला तिढा हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. तसेच तो तिढा उद्धव ठाकरे सोडवतील अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. मोदींच्या सरकारने यंत्रणांवर दबाव आणून त्यांनी दोन राज्यात सरकार पाडलं आहे. तसेच आता देशातली जनात मोदी सरकारविरोधात रस्त्यावर उतरेल. अग्निपथ योजनेविरोधात युवकही रस्त्यावर उतरल्याचे स्पष्ट दिसले होते.
या सगळ्या गोष्टी मागे भाजप असून लवकरचं काही गोष्टी स्पष्ट होतील असं नाना पटोले यांनी सांगितले आहे.