रात्रीस खेळ चाले, शिर्डीतील 3G हॉटेलमध्ये 160 मतदारांचा मुक्काम, पोलिसांना खबर लागली आणि…

| Updated on: Apr 30, 2023 | 12:07 AM

महाविकास आघाडीच्या 160 मतदारांना मतदानाआधी अज्ञातस्थळी नेल्याचा आरोप करण्यात येत होता. याप्रकरणी आरोप झाल्यानंतर पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

रात्रीस खेळ चाले, शिर्डीतील 3G हॉटेलमध्ये 160 मतदारांचा मुक्काम, पोलिसांना खबर लागली आणि...
Follow us on

नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत निवडणुकांमध्ये आपण विजयी उमेदवार पळवून नेल्याचं किंवा अज्ञातस्थळी घेऊन गेल्याचं ऐकलं असेल. पण आता मनमाडमध्ये एक वेगळाच प्रकार बघायला मिळत आहे. मनमाड बाजार समितीसाठी उद्या मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीच्या मतदारांना मतदानाआधी अज्ञातस्थळी नेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीच्या 160 मतदारांना मतदानाआधी अज्ञातस्थळी नेल्याचा आरोप करण्यात येत होता. याप्रकरणी आरोप झाल्यानंतर पोलिसांनी तपास केला. या दरम्यान शिर्डीतील हॉटेल 3G येथे 160 मतदार मुक्कामी असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलीस हॉटेलस्थळी दाखल झाले. पोलिसांनी सर्व मतदारांना बळजबरी हॉटेल बाहेर काढले. यावेळी परिसरातील वातावरणात काहीसं तणाव होतं. मविआकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप केले जात आहेत.

मनमाड बाजार समितीत शिवसेनेचे आमदार सुहास कांदे विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी पोलीस बळाचा वापर करत असल्याचा मविआ नेत्यांचा आरोप आहे. त्यातून थेट मतदारांना हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवण्याचे प्रकार घडत आहेत. पण या प्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. हॉटेलमध्ये मुक्कामासाठी थांबलेल्या मतदारांना पोलिसांनी बाहेर काढलं आहे.

राज्यातला 147 बाजार समितींचा निकाल काय?

राज्यातील 147 बाजार समितींची काल निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा निकाल समोर आलाय. या निवडणुकीत दिग्गज मंत्री, नेते, आमदारांना जबर झटका बसला. दिगज्जांच्या पॅनलचा पराभव झालाय. भाजपच्या पॅनलनं 40 बाजार समित्यांवर विजय मिळवलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 7 बाजार समित्या मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 38 बाजार समित्यांवर विजय मिळालाय.

या निवडणुकीत काँग्रेसचं पॅनल 31 बाजार समित्यांमध्ये विजयी झालंय. तर ठाकरे गट 11 ठिकाणी आणि इतरांच्या वाट्याला 18 बाजार समित्या गेल्या आहेत. युती आणि आघाडीच्या पॅनलचा विचार केला तर, महाविकास आघाडीच्या पॅनलला 81 बाजारसमित्यांवर विजय मिळाला. तर 48 बाजार समित्यांवर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या पॅनलकडे गेल्यात.

शिंदे गटाच्या आमदारांच्या परफॉर्मन्सवर काय?

मालेगाव बाजार समितीत ठाकरे गटाचे अद्वैय हिरेंच्या पॅनलनं मंत्री दादा भूसेंच्या गटाचा पराभव केला. 18 पैकी 10 जागांवर अद्वैय हिरेंच्या पॅनलचा विजय झाला. तर यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस बाजार समितीत मंत्री संजय राठोडांना धक्का बसला. महाविकास आघाडीच्या परिवर्तन पॅनलनं 18 पैकी 14 जागा जिंकल्या.
बुलडाणा बाजार समितीत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या गटाचा पराभव झाला. ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्ष जालिंदर बुधवंत यांच्या गटानं 18 पैकी 12 जागा जिंकल्या.

धाराशीव जिल्ह्यात परंडा बाजार समितीत मंत्री तानाजी सावंत यांच्या गटाला धक्का बसला. मविआच्या पॅनलनं 18 पैकी 11 जागांवर विजय मिळवला. बाजार समित्यांच्या निवडणुकांमधून ग्रामीण भागातला मूड लक्षात येतो. थेट पक्षाच्या चिन्हावर निवडणूका नसल्या तरी, त्या त्या पक्षाचं पॅनल असतेच. बाजार समित्यांचा एकूण निकाल पाहिला तर, भाजपचं पॅनल नंबर 1 वर आहे. मात्र युती आणि महाविकास आघाडीमध्ये. महाविकास आघाडीनं बाजी मारलीय.