सुप्रियाताईंचा सूर आणि दिशादर्शन चुकीचं; संजय राऊतांनी निवडणुकीच्या रणांगणात उतरावं, शेलारांची टोलेबाजी

| Updated on: Oct 11, 2021 | 2:24 PM

लखीमपूर हिंसाचार प्रकरणात भाजपच्या नेत्याच्या सुपुत्राला ही अटक करुन दाखवली आहे. 45 लाख रुपयांची मदत आणि सरकारी नोकरी दिली आहे. निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी समिती नेमण्यात आलीय. त्यामुळे केंद्र सरकारविरोधात पुकारलेला हा बंद म्हणजे रातांधळेपणा असल्याची टीका शेलार यांनी केलीय.

सुप्रियाताईंचा सूर आणि दिशादर्शन चुकीचं; संजय राऊतांनी निवडणुकीच्या रणांगणात उतरावं, शेलारांची टोलेबाजी
आशिष शेलार, आमदार, भाजप
Follow us on

मुंबई : लखीमपूर हिंसाचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज सत्ताधारी महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर जोरदार टीका केलीय. त्यांची भूमिका आणि संवेदना स्पष्ट नाहीत. लखीमपूरच्या घटनेबद्दल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. केंद्र सरकारच्या विरोधात बंद पुकारणे म्हणजे रातांधळेपणा असल्याची टीका शेलार यांनी केलीय. (MLA Ashish Shelar criticizes MP Supriya Sule, MP Sanjay Raut)

लखीमपूर हिंसाचार प्रकरणात भाजपच्या नेत्याच्या सुपुत्राला ही अटक करुन दाखवली आहे. 45 लाख रुपयांची मदत आणि सरकारी नोकरी दिली आहे. निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी समिती नेमण्यात आलीय. त्यामुळे केंद्र सरकारविरोधात पुकारलेला हा बंद म्हणजे रातांधळेपणा असल्याची टीका शेलार यांनी केलीय. सुप्रियाताईंचा सूर आणि दिशादर्शन चुकत आहे. त्यांनी राज्याबद्दल बोलणं योग्य आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत. माजी गृहमंत्री वॉन्टेड आहेत. त्यांच्या अटकेचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत. पोलीस आयुक्तपदी बसलेला व्यक्तीही गायब आहे. मुख्य सचिवांना सीबीआय समन्स जारी करतंय. राज्यात दलालांचा सुळसुळाट आहे, अशी टोलेबाजी शेलार यांनी केलीय.

‘शासकीय इतमामातील बंद’

शेतकऱ्यांनी या बंदला विरोध केलाय. काही दिवसांपूर्वी देशव्यापी बंद पुकारला होता. कुणी पाठिंबा दिला नाही. शेतकऱ्यांच्या अकाऊंटला सहा हजार रुपये पंतप्रधान मोदी देत आहेत. पीक विम्याची दिली जात आहे, असंही शेलार म्हणाले. तसंच जनतेचा या बंदला विरोध होता पण शासकीय अधिकारी कालपासून जनतेच्या मनात भिती निर्माण करीत होते. पोलीस आयुक्त कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं सांगत होते. तर बेस्टचे महाव्यवस्थापक पण अशाच प्रकारे बंद यशस्वी कसे होतील या कामाला लागले होते. पोलीस संरक्षणात, भीती निर्माण करुन हा बंद लादण्यात आला. त्यामुळे हा बंद शासकीय इतमामातील बंद आहे, अशी घणाघाती टीका शेलारांनी केलीय.

ज्यांना वर्तमानपत्रात काळ्या शाईची अक्षरं उमटवायची आहेत, त्यांना जनभावना कळणार नाही. संजय राऊत यांनी निवडणुकीच्या रणांगणात उतरावं, मग त्यांना त्यांची जागा कळेल, अशा शब्दात शेलारांनी राऊतांवर निशाणा साधला.

पवारांचे आवाहन शेतकऱ्यांनी धुडकावले

ज्या सोलापूरमधून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बंदचे आवाहन केले तिथे पहाटे पासून मार्केट यार्ड सुरु होते. शेतकऱ्यांनी आपला माल यार्डात आणला आणि विकला. बंदला प्रतिसाद दिला नाही. ज्या दादरमध्ये शिवसेना भवन आहे त्या दादरची मंडईत शेतीमाल आला, 10 वाजेपर्यंत सर्व व्यवहार झाले. शेतकऱ्यांनी बंदला प्रतिसाद दिला नाही. औरंगाबादसह राज्यातील बऱ्याच मंडयांमध्ये शेतीमाल आला व लिलावही झाले. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी खऱ्या अर्थाने या तिघाडीच्या ढोंगी बंदमध्ये सहभागी झालेले नाहीत, असा टोलाही शेलारांनी लगावलाय.

इतर बातम्या :

मावळ गोळीबारावेळी जालियनवाला बाग हत्याकांड का आठवलं नाही?, फडणवीसांचा पवारांवर निशाणा

‘नैतिकता शिल्लक असेल तर महाराष्ट्र बंद संपण्यापूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करा’ फडणवीसांचं आव्हान

MLA Ashish Shelar criticizes MP Supriya Sule, MP Sanjay Raut