राज्यात दारुची दुकानं सुरु, मंदिरं मात्र बंद! देवेंद्र फडणवीस आक्रमक, सोशल डिस्टन्स पाळत मंदिरं सुरु करण्याची मागणी

| Updated on: Aug 17, 2021 | 5:23 PM

राज्यातील दारुची दुकानं उघडी ठेवता. मात्र, मंदिरं बंद ठेवता हे चूक आहे. जेवढी गर्दी बार किंवा मॉलमध्ये होते त्यापेक्षा कमी गर्दी मंदिरांमध्ये असते. सोशल डिस्टन्स ठेवून मंदिरं सुरु करण्यास काय हरकत आहे? असा सवाल फडणवीस यांनी केलाय. ते आज पंढरपुरात बोलत होते.

राज्यात दारुची दुकानं सुरु, मंदिरं मात्र बंद! देवेंद्र फडणवीस आक्रमक, सोशल डिस्टन्स पाळत मंदिरं सुरु करण्याची मागणी
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
Follow us on

पंढरपूर : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर राज्य सरकारनं निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार दुकानं, मॉल, हॉटेल आदींसाठी रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. मात्र, राज्यातील मंदिरं आणि धार्मिक स्थळं पुढील आदेशापर्यंत बंदच असतील असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील दारुची दुकानं उघडी ठेवता. मात्र, मंदिरं बंद ठेवता हे चूक आहे. जेवढी गर्दी बार किंवा मॉलमध्ये होते त्यापेक्षा कमी गर्दी मंदिरांमध्ये असते. सोशल डिस्टन्स ठेवून मंदिरं सुरु करण्यास काय हरकत आहे? असा सवाल फडणवीस यांनी केलाय. ते आज पंढरपुरात बोलत होते. (Devendra Fadnavis demands to start temples in the state)

आमच्यासाठी सगळीकडे देव आहे. मात्र, अनेक गरीब लोकांची उपजीविका मंदिरांवर अवलंबून आहे. हारवाल्यापासून ते पुजारी अशा अनेकांची उपजीविका ही मंदिरांवर अवलंबून असते. त्यांच्यासाठी तरी मंदिरं उघडा. मंदिरं बंद ठेवणे ही सरकारची चूक आहे. तुम्ही दारुची दुकानं सुरु ठेवता आणि मंदिरं बंद ठेवता, अशा शब्दात फडणवीस यांनी संताप व्यक्त केलाय. शेकापचे दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी आणि सुधारकरपंत परिचारक यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त देवेंद्र फडणवीस पंढरपुरात आले होते. गणपतराव देशमुख यांचं विधिमंडळात उचित स्मारक करण्याची मागणी करणार असल्याचंही यावेळी फडणवीस म्हणाले. शाळा सुरु करण्याच्या निर्णयाबाबत सरकार धरसोड करत आहे. पालकांना आणि विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा असंही फडणवीस यांनी म्हटलंय.

घृष्णेश्वर मंदिरासमोर भाजपचा आंदोलनाचा इशारा

राज्यातील मंदिरे सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजपची अध्यात्मिक आघाडी पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या औरंगाबादेतील घृष्णेश्वर मंदिरासमोर भाजपची अध्यात्मिक आघाडी आंदोलन करणार आहे. तुषार भोसले यांच्या उपस्थितीत हे आंदोलन होणार आहे. सध्या श्रावण महिना सुरु असल्यामुळे भाविकांसाठी श्रावणातील सोमवार हा महत्वाचा दिवस असतो. त्यामुळे श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी हे आंदोलन केलं जाणार असल्याची घोषणा तुषार भोसले यांनी केली आहे. यापूर्वी तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरासमोर भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन केलं होतं.

लसीकरण झालेल्या भाविकांसाठी मंदिरं खुली करा

ज्या शहरांत किंवा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दर कमी आहे तिथे राज्य शासनाने निर्बंधांमध्ये शिथीलता दिली आहे. त्यानुसार आता हॉटेल, स्पा, जीम, सलून सगळं काही नियम आणि अटींनुसार सुरु करण्याला परवानगी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत सगळं खुल केलं मग मंदिर का बंद?, असा सवाल करत लसीकरण झालेल्या भाविकांसाठी मंदिरं खुली करा, अशी मागणीही तुषार भोसले यांनी राज्य शासनाकडे केली आहे. मंदिर उघडण्याचा निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो. मात्र, आता सगळं काही सुरु झालेलं असताना, शासनाने नियमांमध्ये शिथीलता दिलेली असताना मंदिरं उघडण्याचा निर्णय देतील सरकारने घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

इतर बातम्या :

बैलगाडा शर्यत टाळण्यासाठी पोलिसांकडून धरपकड; जेलमध्ये टाकलं तरी शर्यत होणार, गोपीचंद पडळकरांचा आक्रमक पवित्रा

शरद पवार म्हणाले, प्रबोधनकारांचं लिखाण वाचा, आता संभाजी ब्रिगेड राज ठाकरेंना आजोबांची पुस्तकं पाठवणार

Devendra Fadnavis demands to start temples in the state