मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपची अध्यात्मिक आघाडी पुन्हा आक्रमक, घृष्णेश्वर मंदिरासमोर आंदोलनाचा इशारा

| Updated on: Aug 14, 2021 | 4:33 PM

राज्यातील सर्व मंदिरे आणि धार्मिक स्थळं पुढील देशापर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपची अध्यात्मिक आघाडी पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपची अध्यात्मिक आघाडी पुन्हा आक्रमक, घृष्णेश्वर मंदिरासमोर आंदोलनाचा इशारा
तुषार भोसले यांचा मंदिरे उघडण्यासाठी आंदोलनाचा इशारा
Follow us on

औरंगाबाद : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं 15 ऑगस्टपासून दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट्स आदींचे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दुसरीकडे राज्यातील सर्व मंदिरे आणि धार्मिक स्थळं पुढील देशापर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपची अध्यात्मिक आघाडी पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. (BJP’s spiritual front is aggressive in demanding start of temples in Maharashtra)

12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या औरंगाबादेतील घृष्णेश्वर मंदिरासमोर भाजपची अध्यात्मिक आघाडी आंदोलन करणार आहे. तुषार भोसले यांच्या उपस्थितीत हे आंदोलन होणार आहे. सध्या श्रावण महिना सुरु असल्यामुळे भाविकांसाठी श्रावणातील सोमवार हा महत्वाचा दिवस असतो. त्यामुळे श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी हे आंदोलन केलं जाणार असल्याची घोषणा तुषार भोसले यांनी केली आहे. यापूर्वी तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरासमोर भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन केलं होतं.

लसीकरण झालेल्या भाविकांसाठी मंदिरं खुली करा

ज्या शहरांत किंवा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दर कमी आहे तिथे राज्य शासनाने निर्बंधांमध्ये शिथीलता दिली आहे. त्यानुसार आता हॉटेल, स्पा, जीम, सलून सगळं काही नियम आणि अटींनुसार सुरु करण्याला परवानगी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत सगळं खुल केलं मग मंदिर का बंद?, असा सवाल करत लसीकरण झालेल्या भाविकांसाठी मंदिरं खुली करा, अशी मागणीही तुषार भोसले यांनी राज्य शासनाकडे केली आहे. मंदिर उघडण्याचा निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो. मात्र, आता सगळं काही सुरु झालेलं असताना, शासनाने नियमांमध्ये शिथीलता दिलेली असताना मंदिरं उघडण्याचा निर्णय देतील सरकारने घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

कोरोना निर्बंधांबाबत राज्य सरकारचे महत्वाचे निर्णय?

>> 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासाला मुभा. मात्र त्यासाठी कोरोना लसीचे दोन डोस आणि दुसऱ्या डोसनंतर 14 दिवस होणं गरजेचं आहे. याचा पुरावा दाखवल्यावर प्रवाशांना लोकलचे पास दिले जातील. तसंच बेकायदेशीररित्या प्रवास केल्यास 500 रुपये दंडासह उचित कारवाई केली जाणार आहे.

>> हॉटेल्स, रेस्टॉरंट्सना 50 टक्के मर्यादेनं रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. मात्र, वेटिंगला थांबलेले ग्राहक, वेटर, हॉटेल चालक यांनी मास्क घालणं बंधनकारक असणार आहे.

>> विवाह सोहळ्यांबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खुल्या प्रांगणात होणाऱ्या विवाह सोहळ्यांसाठी 200 लोकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. तर मंगल कार्यालयात होणाऱ्या विवाह सोहळ्यांसाठी आसन क्षमतेच्या 50 टक्के मर्यादेनं परवानगी देण्यात आली आहे.

>> सर्व शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांना तातडीने लस देण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.

>> खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झालं असेल तर 100 टक्के उपस्थितीनं काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर खासगी कार्यालयांना 24 तास चालू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, एका सत्रात 25 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीला परवानगी असेल.

>> सर्व दुकानांना रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

>> सिनेमागृह , नाट्यगृह , धार्मिक स्थळे मात्र पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत.

>> इनडोअर स्पोर्टस सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र, खेळाडू आणि चालकांसह सर्वांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणं अनिवार्य आहे.

संबंधित बातम्या :

अजित पवारांना जो प्रश्न पडला, ते तुषार भोसले खरंच कोण आहेत? वाचा सविस्तर

बंडातात्यांच्या अटकेनंतर तुषार भोसले खवळले, म्हणाले, ‘उद्धव ठाकरे- अजितदादा आता तयार रहा…’

BJP’s spiritual front is aggressive in demanding start of temples in Maharashtra