‘भाजपमधील काहीजणांचं मानसिक संतुलन बिघडलं, त्यातील एक पडळकर’, अमोल मिटकरींचा पलटवार

| Updated on: Jun 30, 2021 | 6:26 PM

भाजपमधील दोन-चार जणांचं मानसिक संतुलन ढासळलं आहे त्यामधील पडळकर हे एक आहेत. त्यांची ही बेताल वक्तव्य येत आहेत त्यावर गांभीर्याने लक्ष देणं योग्य वाटत नाही, अशा शब्दात मिटकरी यांनी पडळकरांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

भाजपमधील काहीजणांचं मानसिक संतुलन बिघडलं, त्यातील एक पडळकर, अमोल मिटकरींचा पलटवार
आ. गोपीचंद पडळकर, आ. अमोल मिटकरी
Follow us on

मुंबई : भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खोचक टीका केलीय. पडळकरांच्या या टीकेला आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ‘भारतीय जनता पक्षातील अन्य कुठलीही व्यक्ती अशा पद्धतीने खालच्या पातळीवर प्रतिक्रिया देत नाही. पडळकर ही एक प्रवृत्ती आहे. भाजपमधील दोन-चार जणांचं मानसिक संतुलन ढासळलं आहे त्यामधील पडळकर हे एक आहेत. त्यांची ही बेताल वक्तव्य येत आहेत त्यावर गांभीर्याने लक्ष देणं योग्य वाटत नाही, अशा शब्दात मिटकरी यांनी पडळकरांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. (Amol Mitkari’s reply to Gopichand Padalkar’s criticism of Sharad Pawar)

‘ज्या व्यक्तीने बिरोबाची शप्पथ खाऊन स्वतःच्या समाजाला फसवलं आहे. त्यांच्यावर देवस्थान भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. एका म्हाताऱ्या महिलेची जमीन बळकावणे आणि मंगळसूत्र चोरीचाही गुन्हा त्यांच्यावर आहे. ती व्यक्ती एक प्रवृत्तीच आहे. अशी बांडगुळं भाजपमध्ये वाढत आहेत. याचं आत्मचिंतन भाजपने करावं’, असा टोला मिटकरी यांनी लगावलाय.

‘महाराष्ट्रासोबत दुजाभाव का?’

केंद्र सरकारने कुठलाही दुजाभाव न ठेवता लवकरात लवकर लसीचा पुरवठा केला पाहिजे. गुजरातवर तुम्ही प्रेम करता, महाराष्ट्रातही जनता राहते, त्यामुळे अशाप्रकारचा दुजाभाव केंद्रान करु नये. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेली मागणी रास्त आहे. लसीकरण ठप्प होऊ नये, याची काळजी केंद्रानं घ्यायला हवी. केंद्र सरकारच्या अनेक वल्गना आतापर्यंत फसव्या ठरल्या आहेत. केंद्र सरकारने महाराष्ट्राचा जीएसटी परतावा अद्याप दिलेला नाही. त्यामुळे केंद्र सरकारचे धोरण हे सर्वसामान्यांच्या जीवावर उलटणारं आहे. महाराष्ट्रात त्यांची सत्ता नसल्यामुळेच केंद्र सरकार अशा पद्धतीने वागत असल्याचा आरोप मिटकरी यांनी केलाय.

‘अमित शहा चंद्रकांत पाटलांना किती गांभीर्याने घेतात माहित नाही’

अमित शहा हे चंद्रकांत पाटलांना किती गांभीर्याने घेतात हे मला माहित नाही. महाराष्ट्रात सत्ता नसल्यामुळे चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. त्यांचं पत्र किती गांभीर्याने घ्यावं हे महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे. तंबूतले शिलेदार कायम ठेवायचे असतात. देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय संन्यास घेण्याची भाषा केलेलीच आहे. त्यामुळे आपले शिलेदार पक्षात राहावे म्हणून ही भाषा असल्याचा टोलाही मिटकरींनी लगावलाय.

पडळकरांची शरद पवारांवर टीका

गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे” असं पडळकर म्हणाले. ते सोलापुरात बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी संदर्भात राज्य सरकारला डाटा सादर करण्यास सांगितले होते. मात्र, राज्य सरकारने ते केले नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं डीएनए बहुजन विरोधी आहे, म्हणूनच काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाने विरोधी याचिका दाखल केली. काही जिल्ह्यासाठी मर्यादित असलेल्या नेत्यांना मी मोठे नेते मानत नाही. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे. मी शरद पवार आणि अजित पवारांशी मुद्दयावरुन भांडतो, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

संबंधित बातम्या :

रात गेली हिशोबात, पोरगं नाही नशिबात, शरद पवारांच्या दिल्ली बैठकीवर पडळकरांची जहरी टीका

थोरातांची कन्या म्हणाली, तुमच्या भाषेवरुन संस्काराची ओळख होते, आता पडळकरांचं प्रत्युत्तर

Amol Mitkari’s reply to Gopichand Padalkar’s criticism of Sharad Pawar