सर्वाधिक प्रेम कोणावर, अमित की रितेश? धीरज देशमुखांचं रोखठोक उत्तर

| Updated on: Jan 17, 2020 | 2:28 PM

महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांसह सहा तरुण आमदारांशी संगमनेरमध्ये संवाद साधण्यात आला. यावेळी संगीतकार अवधूत गुप्ते यांनी धीरज देशमुखांचं कुठल्या भावावर जास्त प्रेम आहे असा प्रश्न विचारला.

सर्वाधिक प्रेम कोणावर, अमित की रितेश? धीरज देशमुखांचं रोखठोक उत्तर
Follow us on

संगमनेर : रितेश आणि अमित देशमुखपैकी रितेशवर जास्त प्रेम असल्याचं आमदार धीरज देशमुख यांनी सांगितलं.  महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांसह सहा तरुण आमदारांशी संगमनेरमध्ये संवाद साधण्यात आला. यावेळी संगीतकार अवधूत गुप्ते यांनी धीरज देशमुखांचं कुठल्या भावावर जास्त प्रेम आहे असा प्रश्न विचारला. त्यावर क्षणाचाही विलंब न करता लगेच रितेश असं उत्तर धीरज देशमुख यांनी दिलं. त्यामुळे त्यांचं रितेश देशमुखवरील प्रेम दिसून आलं.

धीरज देशमुख रॅपिड फायर 

1. सर्वाधिक प्रेम कोणावर- अभिनेता रितेश देशमुख की वैज्ञकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख – रितेश देशमुख
2. आवडता चित्रपट कोणता? लय भारी की तुझे मेरी कसम – लय भारी
3. मुख्यमंत्री म्हणून भविष्यात कोणाला पाहायला आवडेल? – आदित्य ठाकरे की रोहित पवार – दोन्ही
4. धीर कोणी धरावा? – उदयनराजे की संजय राऊत – संजय राऊत (अप्रत्यक्ष उत्तर)

करिअर निवडताना बॉलिवूड आणि राजकारण यांच्यापैकी राजकारणाचं पारडं कसं जड झालं, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, “लहान भाऊ म्हणून नेहमी माझ्यासमोर एक प्रश्न होता. मोठे भाऊ जे काम करताता त्यांच्या पावलांवर पाऊल टाकत समोर जाण्याचे संस्कार घरातूनच आपल्यावर होत असतात. माझ्या घरच्यांचीही हिच अपेक्षा होती. माझा एक भाऊ राजकारणात आहे एक बॉलिवूडमध्ये आहे. मात्र या दोन्ही फिल्डमध्ये लोक ठरवतात, की तुम्ही टिकणार की नाही. या फिल्डमध्ये यायचं हे आपण ठरवतो, तिकीट पक्ष देतो, पण निवडून द्यायचं की नाही हे लोक ठरवतात. लातूरच्या लोकांनी ठरवलं, मी राजकारणात यायचं आणि मी निवडून आलो”, असं धीरज देखमुख म्हणाले.

महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांसह सहा तरुण आमदारांशी संगमनेरमध्ये संवाद साधण्यात आला. ‘अमृतवाहिनी महाविद्यालया’तील युवा सांस्कृतिक महोत्सवात ‘संवाद तरुणाईशी’ कार्यक्रमाअंतर्गत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, आमदार रोहित पवार, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दिकी यांना प्रसिद्ध पार्श्वगायक अवधूत गुप्तेंनी बोलतं केलं.

माझे बाबा माझेच नाही तर अनेकांचे हिरो : धीरज देशमुख 

“बाबांचा प्रवास आमदारकी, मंत्रीपद ते मुख्यमंत्री असा झालेला मी पाहिला. एक मुलगा म्हणून खंत असायची की माझे बाबा माझ्यासोबत कमी वेळ घालवतात. मला वडिलांचा सहवास फार मिळाला नाही. पण आज, निवडणूक लढताना, सभागृहात जाताना मला बाबा समजायला लागले, त्यामुळे बाबांनी समाजासाठी खूप केल्याचं जाणवलं. एखादा व्यक्ती आपल्या कुटुंबासाठी खूप काही करु शकतो, पण इतरांच्या कुटुंबासाठी किती करु शकतो. माझे बाबा माझ्यासाठी हिरो आहेत, पण असे अनेक तरुण मला भेटतात जे म्हणतात, तुमचे बाबा आमचे हिरो आहेत, त्याचा अभिमान मला आजही वाटतो”, असं धीरज देशमुखांनी सांगितलं.

“बाळासाहेब थोरात हे लातूरचे पालकमंत्री होते त्यामुळे त्यांच्याशी आमचा स्नेह होता. बाबा मुख्यमंत्री असल्याने त्यांच्यासोबत विमानात फिरण्याचा छंद पूर्ण व्हायचा. बाळासाहेबांच्या आणि साहेबांच्या जेव्हाही बैठका किंवा दौरा असायचा. लातूरची कुठलीही अडचण असेल तर ते आवर्जून बाळासाहेबांना फोन करायचे, बाबांना माहित होतं की नगरपेक्षा जास्त न्याय ते लातूरला देऊ शकतील. 1999 साली बाळासाहेबांनी थोरात यांनी बाबांकडून कृषी खातं मागितलं आणि बाबांनी ते लगेच दिलं. कारण त्यांना माहित होतं, की ते या क्षेत्राला पुढारण्याचं काम करतील”, असे सांगत धीरज देशमुखांनी बाळासाहेब थोरातांवर स्तुतीसुमनं उधळली.

यापुढे महाराष्ट्रात विकासाचाच पॅटर्न

“विलासराव देशमुख यांच्या नजरेतील मराठवाडा हा दुष्काळमुक्त मराठवाडा आहे, आमच्या महाविकास आघाडी सरकारचे काही निर्णय हे दुष्काळमुक्तीसाठी घेण्यात आले आहेत. संपूर्ण मंत्रिमंडळ त्या विचाराने चालत आहे. महाराष्ट्र हा नंबर एक होता आणि राहिल हे त्यांचं स्वप्न होतं. मला खात्री आहे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून यापुछे महाराष्ट्रात विकासाचाच पॅटर्न चालेलं”, असा विश्वास धीरज देखमुख यांनी व्यक्त केला.