VIDEO | काँग्रेसची तीन मतं फुटली? थोरात, चव्हाण, बंटी पाटील फडणवीसांना भेटले, लॉबीत नेमकं काय घडलं?

| Updated on: Jun 20, 2022 | 1:20 PM

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान पार पडतंय. सकाळी 10 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. यावेळी विधान भवनाच्या लॉबीत टिपलेला हा एक अत्यंत हलका-फुलका क्षण आहे.

VIDEO | काँग्रेसची तीन मतं फुटली? थोरात, चव्हाण, बंटी पाटील फडणवीसांना भेटले, लॉबीत नेमकं काय घडलं?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः स्थळ विधान भवनाची लॉबी. भाजपचे गेमचेंजर देवेंद्र फडणवीस इतर आमदारांच्या ग्रुपसह येतात. त्यांच्यासमोर काँग्रेसचे तीन आमदार. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि सतेज ऊर्फ बंटी पाटील. या तिघांना पाहताच फडणवीस दिलखुलासपणे हसतात आणि  म्हणतात, मला कळालंय काँग्रेसचे तीन मतदार फुटले
अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या विधान भवनात एकिकडे मतदान पार पडतंय तर दुसरीकडे विधान भवनाच्या लॉबीत हे दृश्य दिसतंय..

राज्यसभा निवडणुकीत आकड्यांचं परफेक्ट गणित करणाऱ्या फडणवीसांच्या (Devendra Fadanvis) कौशल्यानं भल्या-भल्यांना धडकी भरतेय. आजच्या विधान परिषद निवडणुकीत मात्र आपलं गणित चुकू नये म्हणून महाविकास आघाडीनं (Mahavikas Aghadi) चांगलाच अभ्यास केलाय. आमदारांचं मत ऐनवेळी फिरलं तर त्याची कुणीही गॅरेंटी घेऊ शकत नाहीत. पण अशा अत्यंत हायप्रोफाइल लढतीच्या वेळी काही हसरे आणि हलके-फुलके क्षणही अनुभवायला मिळतात. राज्यभरातील आमदार मतदानासाठी विधानभवनात दाखल झालेत. यावेळी भाजपचे गेमचेंजर फडणवीस आणि काँग्रेसचे नेते समोरा-समोर आले तर फडणवीसांनी आमदारांच्या फुटण्यावरून चपखल विनोद केला. विशेष म्हणजे समोरून आलेल्या काँग्रेस आमदारांनीही (Congress MLA) त्याला अत्यंत चतुराईनं उत्तर देत फेटाळून लावलं…

काय घडलं नेमकं?

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान पार पडतंय. सकाळी 10 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. यावेळी विधान भवनाच्या लॉबीत टिपलेला हा एक अत्यंत हलका-फुलका क्षण आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार प्रवीण दरेकर, आमदार प्रशांत बंब आदींसह एकिकडून येत होते. त्यांच्या समोरून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि सतेज (बंटी) पाटील आले. यावेळी फडणवीसांनी दिलखुलासपणे हसत विनोद केला. तीन मतदार फुटले, असे ते म्हणाले. यावेळी काँग्रेस बंटी पाटलांनीही फडणवीसांचं वाक्य खाली न पडू देता… तो मी नव्हेच.. असं म्हटलं. फडणवीसांनीही पाटलांना दाद देत.. अरे हो.. हा नव्हेच.. असे म्हणत पाठ थोपटली… विधान भवनात टिपलेलं हे अत्यंत बोलकं दृश्य आज राजकीय वर्तुळात चांगलंच चर्चेत आहे.

निवडणुकीचं गणित काय?

  • आजच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत 10 जागांसाठी 11 उमेदवार उभे आहेत.
  • विधानसभेतील बलाबल 285 सदस्यांचं आहे.
  •   मतांचा कोटा 26 आहे.
  • शिवसेनेकडे 55 मते असून दोन उमेदवार आहेत. अतिरिक्त मते 3
  • राष्ट्रवादीकडे 51 मते तर दोन उमेदवार आहेत. त्यामुळे यांना अतिरिक्त 1 मताची गरज आहे.
  • काँग्रेसची 44 मते असून दोन उमेदवार आहेत.  त्यांना 8 मतांची गरज आहे.
  • भाजपकडे 106 मते असून पाच उमेदवार आहेत. त्यांना अतिरिक्त 24 मतांची गरज आहे.
  • अपक्ष आणि इतर लहान पक्षांची मते 29 आहेत.

काँग्रेसला खरंच मत फुटण्याची भीती?

भाजपने पाचवा तर काँग्रेसने दुसरा उमेदवार उभा केल्यामुळे यंदा काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी प्रतिष्ठेची लढाई आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना असताना भाजपने ऐनवेळी खेळी उलटवून लावत भाजपचा उमेदवार निवडून आणला. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचा दुसरा उमेदवार म्हणजे भाई जगताप निवडून येण्यासाठी काँग्रेसला 8 मते कमी पडत आहेत. तर भाजपचा पाचवा उमेदवार अर्थात प्रसाद लाड यांना जिंकण्यासाठी 24 मतांची गरज आहे. यातही फोडाफोडीचं राजकारण झालं तर भाजपपुढे काँग्रेसची खैर नाही, याची जाणीव सगळ्यांनाच आहे. त्यामुळे मते फुटू नयेत, यासाठी काँग्रेसने संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली आहे. निवडणुकीचा निकाल आज संध्याकाळीच लागणार असल्यानं राज्यातील जनतेची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.