
निवृत्ती बाबर, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची लवकरच घोषणा होणार आहे. त्यामुळे यावेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) एकत्र येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याआधीच हे दोन्ही पक्ष मुंबईतील दि बेस्ट इम्प्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड अर्थात बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत (Mumbai Best Society Election Result) एकत्र आलेले आहेत. दरम्यान, आता या निवडणुकीच्या निकालाचा कल समोर आला आहे. ठाकरे बंधूंना या पतपेढी निवडणुकीत एकही जागा मिळालेली नाही.
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत एकूण 21 जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. या निवडणुकीसाठी मनसे आणि ठाकरे गटाने एकत्र येत उत्कर्ष पॅनेलची स्थापना केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही भावांनी एकत्र यावे, अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. त्याआधीच बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंनी एकत्र येत निवडणूक लढवल्यामुळे या निवडणुकीची महाराष्ट्रभर चर्चा होती. मात्र आता या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलला एकही जागा मिळालेली नाही. त्यांना भोपळाही फोडता आलेला नाही.
बेस्टच्या पतपेढीवर गेल्या नऊ वर्षांपासून ठाकरेंच्या कामगार सेनेची सत्ता आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या कामगार सेनेसाठी ही निवडणूक एका प्रकारे आपली ताकद कायम असल्याचे दाखवण्याची सर्वोत्तम संधी होती. म्हणूनच या निवडणुकीची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र ठाकरे यांना एकहाती सत्ता मिळवता येण्याची शक्यता धूसर आहे. भाजपाचे नेते प्रसाद लाड नेतृत्व करीत असलेल्या महायुतीच्या श्रमिक पॅनेलमुळे ठाकरे बंधूंना फटका बसला.
या निवडणुकीत एकूण 21 जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. शशांक राव यांच्या पॅनेललने एकूण 14 जागा जिंकल्या. तर भाजपाचे नेते प्रसाद लाड यांच्या पॅनेलले सात जागांवर विजय मिळवला. ठाकरेंच्या उत्कर्ष पॅनेलला एकही जागा मिळालेली नाही.