लोकल प्रवासासाठी मुंबईकर जनताच 2 ऑगस्टपासून सविनय नियमभंग करेल, भाजपचा ठाकरे सरकारला इशारा

| Updated on: Jul 22, 2021 | 5:20 PM

मुंबईतील प्रवासाच्या सुविधेबाबत ठाकरे सरकारकडे धोरण नाही. त्यामुळे सामान्य माणसाचे अतोनात हाल होत असल्याची टीका उपाध्ये यांनी केलीय.

लोकल प्रवासासाठी मुंबईकर जनताच 2 ऑगस्टपासून सविनय नियमभंग करेल, भाजपचा ठाकरे सरकारला इशारा
केशव उपाध्ये, मुंबई लोकल
Follow us on

मुंबई : मुंबईतील सामान्य नोकरदार, कष्टकऱ्यांना उपनगरी प्रवासाची परवानगी न देणाऱ्या ठाकरे सरकारला धडा शिकविण्यासाठी सामान्य मुंबईकर 2 ऑगस्टपासून सविनय नियमभंग करीत लोकल प्रवास सुरु करतील, असा इशारा भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी दिला. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात भाजपची पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी बोलताना मुंबईतील प्रवासाच्या सुविधेबाबत ठाकरे सरकारकडे धोरण नाही. त्यामुळे सामान्य माणसाचे अतोनात हाल होत असल्याची टीका उपाध्ये यांनी केलीय. (Keshav Upadhyay warns Mahavikas Aghadi government from Mumbai local travel)

सामान्य माणसाला उपनगरी प्रवासास परवानगी देण्यास हरकत नसल्याचे केंद्र सरकारनं दोन आठवड्यांपूर्वीच स्पष्ट केलं आहे. असं असताना राज्य सरकार सामान्य माणसाला उपनगरी रेल्वे प्रवासास परवानगी देण्याच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. टाळेबंदीबाबतच्या राज्य सरकारच्या धरसोडपणामुळे जनतेचे जगणे अगोदरच मुश्कील झाल्याचं उपाध्ये म्हणाले. सामान्य माणसाला लोकल प्रवासास परवानगी द्या. अन्यथा प्रवास खर्चापोटी 5 हजार रु. भत्ता द्या, या भाजपाने केलेल्या मागणीकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केलं. वैतागलेला सामान्य माणूस आघाडी सरकारच्या निषेधार्थ मोफत लोकल प्रवास करून सविनय नियमभंग आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय.

‘सरकारने आपल्या खोटेपणाची कबुली दिली’

महाराष्ट्रात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नसल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनेच न्यायालयात दिलं आहे. त्यामुळे आघाडी सरकारचा खोटेपणा पुन्हा उघड झाला आहे. केंद्र सरकार ऑक्सीजनचा पुरेसा पुरवठा करत नसल्याचे आरोप मुख्यमंत्री आणि आघाडी सरकारमधील काही मंत्री करत होते. आता न्यायालयात दिलेल्या शपथपत्रामुळे या सरकारने आपल्या खोटेपणाची कबुली दिल्याचा टोला उपाध्ये यांनी लगावला आहे.

‘पटोलेंच्या आरोपांबाबत खुलासा करा’

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याच्या आरोप केला होता. त्या आरोपांबाबत काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्तेत असलेल्या आघाडी सरकारने अजून स्पष्टीकरण दिलेलं नाही. राज्य सरकारने पटोले यांच्या आरोपांबाबत तातडीने खुलासा करावा आणि पटोले यांच्या आरोपांची चौकशी करावी, अशी मागणीही उपाध्ये यांनी केली आहे.

राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

गेल्या 15 महिन्यांपासून देशाप्रमाणे महाराष्ट्रात अनेक प्रकारचे निर्बंध महाराष्ट्र सरकारने लागू केले आहेत. हे निर्बंध आपण सर्वच जण पाळत आलो आहोत. पण आजकाल हे निर्बंध नक्की कोणासाठी असा प्रश्न पडू लागला आहे. त्यातल्या त्यात सध्या मुंबई शहरासाठी जे निर्णय घेतले जात आहेत ते तर अनाकलनीय आहेत.

मुंबईतील जवळजवळ सर्व कार्यालय सुरु आहेत. सर्वाना घरून काम करता येणं शक्य नाही. यासाठी त्यांना रोज अनेक तास प्रवास करावा लागतो आहे. त्यात लोकल सेवा बंद असल्यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत. महाराष्ट्र सरकारनं बस सेवेला परवानगी दिली; पण लोकल बंद असल्याने या बसमध्ये प्रचंड गर्दी होत असते. अशा गर्दीत प्रवास केल्यानं रोगही अधिक पसरण्याचाच धोका आहे. त्यामुळे ‘बस सुरु आणि लोकल बंद’ ह्यानं नेमकं काय साध्य होणार? असा सवाल राज ठाकरे यांनी पत्रातून विचारला आहे.

संबंधित बातम्या :

स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांचं 20 लाखाचं कर्ज भाजपनं फेडलं; सरकार असंवेदनशील, देवेंद्र फडणवीसांची टीका

‘देशमुखांचे पळण्याचे मार्ग बंद, ठाकरे सरकारचंही तोंड काळं’, हायकोर्टाच्या निर्णयानंतर भाजपचा घणाघात

Keshav Upadhyay warns Mahavikas Aghadi government from Mumbai local travel