स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वबळावरच लढणार, नाना पटोलेंचा पुनरुच्चार

| Updated on: Jun 11, 2021 | 7:38 PM

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढेल, असा पुनरुच्चार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय.

स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वबळावरच लढणार, नाना पटोलेंचा पुनरुच्चार
nana patole
Follow us on

अमरावती : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीतील घटकपक्ष एकत्र जोमाने लढतील, अशी घोषणाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापन दिनी केली. मात्र, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढेल, असा पुनरुच्चार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झालीय. नाना पटोले सध्या मिशन विदर्भ अंतर्गत विदर्भातील जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. त्यावेळी त्यांनी अकोला आणि अमरावतीमध्ये काँग्रेस स्वबळावरच लढणार असल्याचं पुन्हा एकदा म्हटलंय. (Congress will contest local bodies and assembly elections on its own)

भाजप हा आमचा कायम विरोधी पक्ष आहे. शरद पवार भाजपविरोधात मोट बांधत असतील तर चांगली गोष्ट आहे. मात्र, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार, असं पटोले यांनी पुन्हा एकदा जाहीर केलंय. त्याचबरोबर भाजपमध्ये गेलेली नेतेमंडळी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची आपल्याकडे मोठी यादी आहे, पण आता सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार बनवलं जाईल, असंही पटोले यांनी म्हटलंय.

प्रकाश आंबेडकरांशीही चर्चा करणार

धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन टाळण्यासाठी आघाडीच्या दृष्टीने प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करणार असल्याचं पटोले यांनी सांगितलं. आंबेडकर आणि काही छोट्या राजकीय पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी चर्चा करण्यात येईल. मात्र, अद्याप कुणाशीही चर्चा सुरू झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पटोले यांच्या या विधानामुळे राज्यात नव्या समीकरणाची नांदी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

‘महाविकास आघाडी पुढेही जोमानं एकत्र काम करेल’

ठाकरे-मोदी भेटीवर बोलताना पवारांनी महाविकास आघाडी एकसंध राहील असा दावा केलाय. पवार म्हणाले, “मघाशी मी सांगितलं की शिवसेनेसोबत आपण कधी काम केलं नाही. पण हा महाराष्ट्र शिवसेनेला काम करताना गेली अनेक वर्षांपासून पाहतोय. माझं स्वत:चा यापूर्वीचा अनुभव एक विश्वास असावा असाच आहे. एक साधं उदाहरण सांगतो, ज्यावेळेला देशात जनता पक्षाची सत्ता आली. त्यावेळी सगळीकडे काँग्रेसचा पराभव झाला असतानाही अशा स्थितीत काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक राजकीय पक्ष पुढे आला. तो राजकीय पक्ष म्हणजे शिवसेना. शिवसेना फक्त पुढे आली नाही, तर त्यांनी धोरणात्मक निर्णय घेतला की, या निवडणुकीत इंदिरा गांधी यांना विजयी करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार देणार नाही”.

“तुम्ही विचार करा की, विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि पक्षाचा नेता असा निर्णय घेतो की, आम्ही निवडणुकाच लढणार नाही. त्या नेत्याची स्थिती काय होईल. पण त्याची चिंता कधी बाळासाहेब ठाकरेंनी बाळगली नाही. त्यांनी शब्द दिला होता आणि तो त्यांनी पाळला, हा इतिहास विसरता येत नाही. त्यामुळे कुणी काहीही शंका घेतली तरी शिवसेनेनं ज्या पद्धतीने, ज्या कालखंडात ही ठाम भूमिका घेतली, ती भूमिका ते बदलतील असे आडाखे कुणी बांधत असेल तर ते वेगळ्या नंदनवनात राहतात, एवढंच मी सांगेल. हे सरकार ५ वर्षे टिकेल, काम करेल. फक्त ५ वर्षे नाही तर आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अधिक जोमाने एकत्र काम करुन सामान्य जनतेचं प्रभावीपणे देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही”, असं भाकीतही पवारांनी यावेळी केलं आहे.

संबंधित बातम्या :

प्रकाश आंबेडकरांशी आघाडी करण्यासाठी लवकरच चर्चा करणार; नाना पटोलेंचं मोठं विधान

‘शरद पवार शिवसेनेसोबत निवडणूक लढणार नाहीत, ही तर काँग्रेसला दिलेली धमकी’, नारायण राणेंचा दावा

Congress will contest local bodies and assembly elections on its own