मुख्यमंत्री म्हणाले, स्वबळाची भाषा केली तर लोक जोड्यानं हाणतील, त्यावर नाना पटोले म्हणतात…

| Updated on: Jun 19, 2021 | 10:47 PM

नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांच्या स्वबळाचा किंवा एकहाती सत्ता आणण्याचा नारा दिला तर लोक तुम्हाला जोड्याने हाणतील, या इशाऱ्यावर उत्तर दिलंय.

मुख्यमंत्री म्हणाले, स्वबळाची भाषा केली तर लोक जोड्यानं हाणतील, त्यावर नाना पटोले म्हणतात...
Follow us on

मुंबई : सध्या राज्याच्या राजकारणात स्वबळावरुन निवडणूक लढवण्याचा मुद्दा चांगलाच गाजतोय. काँग्रेसने आगामी काळात स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली. त्यानंतर त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (19 जून) शिवसेनेच्या वर्धापन दिनीनिमित्त बोलताना अप्रत्यक्षरित्या उत्तर दिलं. तुम्ही स्वबळाचा किंवा एकहाती सत्ता आणण्याचा नारा दिला तर लोक तुम्हाला जोड्याने हाणतील, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. त्यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिलंय. उद्धव ठाकरे काँग्रेसबाबत असं बोलल्याचं स्पष्ट झालं तर आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ असं म्हणत त्यांनी दंड थोपटले (Nana Patole answer CM Uddhav Thackeray over independent election remark).

नाना पटोले म्हणाले, “स्वबळाची भाषा जसे आम्ही करतो तसे भाजपवाले पण करतात. त्यामुळे मुख्यमंत्री कुणाला बोलले ते स्पष्ट नाही. आम्ही कोरोना काळात जनतेच्या सेवेत होतो. त्यामुळे आम्हाला जोडे मारण्याचा प्रश्नच नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा कार्यक्रम होता. ते पक्षप्रमुख म्हणून बोलले. त्यामुळे ते असं वाक्य बोलले असतील. जर हे काँग्रेसबाबत बोलल्याचे स्पष्ट झाले तर आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ. एक राजकीय पक्ष म्हणून आम्ही स्वबळावर निवडणूका लढण्याचा निर्णय घेण्यात गैर काय आहे.”

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

काँग्रसेने स्वबळावर निवडणुका लढण्याचा नारा दिला आहे. त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेवर जोरदार हल्ला चढवला आहे. तुम्ही स्वबळाचा किंवा एकहाती सत्ता आणण्याचा नारा दिला तर लोक तुम्हाला जोड्याने हाणतील, असा अप्रत्यक्षपणे इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला दिला आहे.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्ताने शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधतानाच काँग्रेसलाही स्वबळाच्या नाऱ्यावरून टार्गेट केलं. अनेक जण स्वबळाचा नारा देत आहेत. स्वबळ म्हणजे केवळ एकट्याने निवडणूक लढणं असं नाही. त्यासाठी ताकद लागते. स्वाभिमान लागतो, असं सांगतानाच कोरोनाचं संकट आहे. अशा वेळी स्वबळाचा नारा दिला, एक हाती सत्ता आणू म्हटलं तर लोक तुम्हाला जोड्याने हाणतील, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. स्वबळाचा नारा काय देता? माझ्या रोजी रोटीचं काय? तू पुढे चालला माझं काय? असं लोक म्हणतील, असंही ते म्हणाले.

तर देश अराजकतेकडे जाईल

निवडणुका एके निवडणुका आणि सत्ता प्राप्ती या सर्व गोष्टी बाजूला ठेवून पुढे येणाऱ्या आर्थिक संकटाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आर्थिक संकटाचा सामना कसा करायचा याचा विचार केला पाहिजे. ते न करता विकृत राजकारण केलं तर देश अराजकतेकडे जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

संबंधित बातम्या :

हाणामारी, रक्तपात हा आपला गुणधर्म नाही, मुंबई दंगलीवेळी शिवसैनिक जगाने पाहिला : उद्धव ठाकरे

‘…यालाच शिवसैनिक म्हणतात’, दादरमधील राड्यावर उद्धव ठाकरेंचा अप्रत्यक्ष निशाणा

स्वबळाचा नारा हा आमचा हक्क, वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचं मोठं भाष्य

संबंधित व्हिडीओ पाहा :

Nana Patole answer CM Uddhav Thackeray over independent election remark