‘नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवली’, नाना पटोलेंचा पुन्हा मोदींवर हल्लाबोल

| Updated on: Jun 24, 2021 | 5:03 PM

सत्तेत आल्यापासून मोदींनी सर्व व्यवस्थाच मोडीत काढली. देशाचा पंतप्रधान हे सर्वोच्च व सन्मानाचं पद आहे. मात्र, नरेंद्र मोदी यांनी या पदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवली आहे, असा घणाघात काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय.

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवली, नाना पटोलेंचा पुन्हा मोदींवर हल्लाबोल
नाना पटोले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us on

धुळे : ‘केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला लोकशाही मान्य नाही. त्यांचा कारभार ठोकशाही पद्धतीने चालतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले, या संविधानाचे रक्षण करण्याचे काम काँग्रेसने केले म्हणून एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला. परंतु सत्तेत आल्यापासून मोदींनी सर्व व्यवस्थाच मोडीत काढली. देशाचा पंतप्रधान हे सर्वोच्च व सन्मानाचं पद आहे. मात्र, नरेंद्र मोदी यांनी या पदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवली आहे, असा घणाघात काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. शिरपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. (Nana Patole criticizes PM Narendra Modi over fuel price hike and Corona)

‘मोदी सरकारने कोरोना संकटात देशातील जनतेला वाऱ्यावर सोडून दिले. लोक तडफडून मरत असताना मोदी पश्चिम बंगालमध्ये प्रचारात व्यस्त होते. लसीकरण मोहिमेच्या अपयशाने मोदींचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे. देशातील जनतेला लसींची गरज असताना मोदींनी पाकिस्तान सारख्या शत्रू राष्ट्राला मोफत लस दिली आणि देशातील लोकांना मात्र लस विकत घेण्यासाठी भाग पाडले जात आहे. लसीकरण मोहिम फसली आहे परंतु प्रसिद्धीचा हव्यास लागलेल्या मोदींनी लसीकरणाचे श्रेय घेण्यासाठी कॉलेजमध्ये मोदींना धन्यवाद देणारे पोस्टर्स व होर्डींग्स लावण्याचे फर्मान काढले आहे. लोकशाही मध्ये फर्मान कसे काय काढले जाऊ शकते?’, असा सवाल पटोले यांनी केलाय.

‘मोदी सरकार जनतेच्या खिशावर दरोडा टाकतंय’

त्याचबरोबर मोदी सरकार हे सामान्य लोकांचे, शेतकरी, कष्टकरी लोकांचे सरकार नाही. जनता महागाईत होरपळत आहे. शेजारच्या श्रीलंका, भूतान, नेपाळमध्ये पेट्रोल 60-65 रुपये लिटर आहे. आपल्याला मात्र त्यासाठी 100 रुपये मोजावे लागत आहेत. भरमसाठ कराच्या रुपाने मोदी सरकार जनतेच्या खिशावर दरोडा टाकत असल्याचा गंभीर आरोप पटोले यांनी केलाय.

‘भाजपचे अनेक नेते काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक’

माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षातील अनेक आजी-माजी आमदार, नेते हे काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्यास इच्छुक आहेत. मध्यंतरी भाजपाने सीबीआय, ईडी सारख्या केंद्रीय यंत्रणामार्फत दबाव आणून भाजपात प्रवेश करण्यासाठी भाग पाडले ते भाजपात गेले असले तरी मनाने ते काँग्रेसचे आहेत त्यांच्या मनातून काँग्रेस जात नाही, असे अनेक जण काँग्रेस मध्ये येण्याच्या तयारीत असल्याचा दावा पटोले यांनी केलाय.

‘काँग्रेसला गतवैभव प्राप्त करायचं आहे’

धुळे, नंदुरबार जिल्हा हा काँग्रेस विचारांना मानणारा आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा नारळ इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांनी याच धुळे, नंदुरबार जिल्ह्यातच फोडला जातो. काँग्रेस पक्ष हा आदिवासी, दलित, वंचित, सामान्य लोकांना न्याय देणारा पक्ष आहे. स्वातंत्र्याची जशी चळवळ उभी राहिली होती तशीच चळवळ पुन्हा उभी करून काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून द्यायचे आहे, असं आवाहन पटोले यांनी केलंय. उत्तर महाराष्ट्र दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शिरपूर, शिंदखेडा, दोंडाईचा येथील काँग्रेस कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी कार्यकर्ते व शेतकरी यांच्याशी त्यांनी संवाद साधला. कोरोना संकटात आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र काम केलेल्या आशा स्वयंसेविकांचा दोंडाईचा इथं नाना पटोले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

संबंधित बातम्या :

आधी स्वबळाची भाषा, आता दौरा अर्धवट, नाना पटोले तातडीने दिल्लीला रवाना

काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकेल असं वाटत नाही, जयंत पाटलांचा टोला

Nana Patole criticizes PM Narendra Modi over fuel price hike and Corona