येवला दौरा गडबडीत उरकून छगन भुजबळ मुंबईला रवाना

| Updated on: Aug 20, 2019 | 8:01 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आपल्या पूर्वनियोजित येवला मतदारसंघातील दौरा घाईत उरकून मुंबईला रवाना झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेला जोर येत आहे.

येवला दौरा गडबडीत उरकून छगन भुजबळ मुंबईला रवाना
Follow us on

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आपल्या पूर्वनियोजित येवला मतदारसंघातील दौरा घाईत उरकून मुंबईला रवाना झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेला जोर येत आहे.

मुंबईत आज काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होत आहे. यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतले जाणार आहेत. दरम्यान, भुजबळ मात्र आपल्या येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. त्यामुळे भूजबळ यांना पक्षाच्या अधिकृत मेलवरून बैठकीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही स्वतः त्यांना फोन करुन हजर राहण्यास सांगितल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

तत्कालीन मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन आहेर शिवसेनेत गेल्यानंतर भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला चांगलाच जोर आला होता. त्यावेळी स्वतः भूजबळ यांनी शिवसेनेत जाणार नसल्याचे स्पष्ट करत या चर्चेला पूर्णविराम दिला होता. मात्र, आता पुन्हा ही चर्चा रंगू लागली आहे.

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी आपल्या हातात शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला आहे. निर्मला गावित नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे 9 वेळा खासदार राहिलेल्या काँग्रेस नेते माणिकराव गावित यांची कन्या आहेत. त्यांच्या पक्षांतरामुळे भुजबळही शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत.

नाशिक जिल्ह्यातील येवला आणि चांदवड तालुका 40 वर्षांपासून दुष्काळग्रस्त आहे. त्यांना पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्यातून पाणी पुरवठा होण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात मांजरपाडा प्रकल्पाचे काम सुरू झाले. यासाठी भुजबळांनी महत्त्वकांक्षी प्रकल्प आखला. त्यात 12 किलोमीटर डोंगरातून बोगदा करत गुजरातकडे समुद्रात वाहून जाणारे पाणी पुणेगाव धरणात आणले. तेथून हे पाणी दरसवाडी धरणात आले असून पुढे चांदवड तालुक्यातील केद्राई धरणात पोहोचले.

लवकरच हे पाणी येवला तालुक्यात यावे यासाठी भुजबळ यांनी कालव्यातील अडथळे दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. त्यासाठी ते सोमवारपासून (19 ऑगस्ट) येवला दौऱ्यावर होते. मात्र, मंगळवारी (20 ऑगस्ट) अचानक भुजबळ यांना मुंबईमध्ये येण्याचे आदेश मिळाल्याने ते कालव्याची पाहणी घाईगर्दीत उरकून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. त्यामुळे आता भूजबळ मुंबईत जाऊन या बैठकीला उपस्थित राहणार की बैठकीकडे पाठ फिरवत शिवसेनेची वाट धरणार? याचं उत्तर लवकरच मिळणार आहे.