बीडमधील राष्ट्रवादीचा चेहराच भाजपच्या वाटेवर, जयदत्त क्षीरसागर मोठ्या निर्णयाच्या तयारीत

| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM

बीड : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला बीडमध्ये सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असलेले आणि लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून काहीसे अलिप्त असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे त्यांची राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत. संपूर्ण क्षीरसागर कुटुंबासह त्यांनी हजारो कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. यानंतर ते त्यांचा निर्णय जाहीर करतील. […]

बीडमधील राष्ट्रवादीचा चेहराच भाजपच्या वाटेवर, जयदत्त क्षीरसागर मोठ्या निर्णयाच्या तयारीत
Follow us on

बीड : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला बीडमध्ये सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असलेले आणि लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून काहीसे अलिप्त असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे त्यांची राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत. संपूर्ण क्षीरसागर कुटुंबासह त्यांनी हजारो कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. यानंतर ते त्यांचा निर्णय जाहीर करतील. गेल्या काही दिवसांपासून भाजपशी वाढलेली जवळीक पाहता ते भाजपात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

फेसबुक पोस्ट टाकून जयदत्त क्षीरसागर यांनी मोठे संकेत दिले होते. वज्रमूठ बांधलेला फोटो त्यांनी शेअर केला होता. बीड लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून अगोदर उमेदवाराची शोधाशोध सुरु होती. अखेर उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आणि प्रचारही सुरु झाला. पण जयदत्त क्षीरसागर हे प्रचारापासून अलिप्त आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढली आहे.

कोण आहेत जयदत्त क्षीरसागर?

बीडमधून तीन वेळा खासदार राहिलेल्या केसरबाई क्षीरसागर यांचे ते चिरंजीव आहेत. जयदत्त क्षीरसागर हे काँग्रेसमध्ये होते. नंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत ते राष्ट्रवादीत आले. राष्ट्रवादीत एक ओबीसी चेहरा आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तोडीस तोड म्हणून राष्ट्रवादीने त्यांना मंत्री मंडळात अनेकदा संधी दिली. देशासह राज्यात भाजपची लाट सुरू असताना बीड जिल्ह्यातून ते राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक विजयी झाले होते. जिल्ह्यात दमदार यंत्रणा असणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे सर्वात जास्त शिक्षण संस्था आहेत. बीड, धारूर, माजलगाव आणि शिरूर तालुक्यात जयदत्त क्षीरसागर यांचा मोठा प्रभाव आहे. सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती, बीड नगरपालिका, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्था क्षीरसागर यांच्या ताब्यात आहेत.

क्षीरसागर कुटुंबात वाद

काका-पुतणे यांचा वाद हा महाराष्ट्राला काही नवीन नाही. ठाकरे घरात पहिली ठिणगी पेटल्यानंतर हा प्रकार दिग्गज नेत्यांच्या घरी सुरु राहिला. यात दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि पुतणे धनंजय मुंडे यांचं घर फुटलं. त्यानंतर जिल्ह्यात मोठा दुसरा धक्का तो म्हणजे क्षीरसागर घराण्याला बसला. पुतणे संदीप क्षीरसागर यांना जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यावरून घरात वाद पेटला तो अद्याप शमलाच नाही. नाराज पुतणे संदीप क्षीरसागर यांची नाराजी वाढतच गेली आणि काकू नाना आघाडी स्थापन करून खऱ्या अर्थाने संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांच्याविरुद्ध बंड पुकारलं. पुतण्याला जिल्ह्यातील पक्षातील काही नेत्यांकडूनच जाणिवपूर्वक बळ दिलं जात असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर नाराज आहेत.