निर्मला गावित शिवबंधनात, रश्मी बागल यांनी करमाळ्यातून तिकीट मागितलं

| Updated on: Aug 21, 2019 | 2:34 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापुरातील नेत्या रश्मी बागल  (Rashmi Bagal)आणि काँग्रेसच्या इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित (Nirmala Gavit) यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

निर्मला गावित शिवबंधनात, रश्मी बागल यांनी करमाळ्यातून तिकीट मागितलं
Follow us on

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापुरातील नेत्या रश्मी बागल  (Rashmi Bagal)आणि काँग्रेसच्या इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित (Nirmala Gavit) यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधलं. यावेळी रश्मी बागल  (Rashmi Bagal) आणि निर्मला गावित यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मातोश्रीवर उपस्थित होते. यावेळी टीव्ही 9 मराठीने रश्मी बागल आणि निर्मला गावित यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.

करमाळा विधानसभा लढवणार : रश्मी बागल

रश्मी बागल म्हणाल्या, राजकारणात महत्वकांक्षा असल्याशिवाय कुणी राहू शकत नाही. मी करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेना पक्षनेतृत्वाकडे इच्छा व्यक्त केली आहे. नेतृत्व काय तो निर्णय घेईल”

रश्मी बागल यांच्या या प्रतिक्रियेनंतर विद्यमान शिवसेना आमदार नारायण पाटील तुमच्या प्रवेशामुळे नाराज आहेत का असं विचारलं असता, त्याबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असं त्यांनी सांगितलं.

कोण आहेत रश्मी बागल?

  • दिगंबरराव बागल यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या जागी रश्मी बागल यांच्या मातोश्री श्यामल बागल यांना राष्ट्रवादीने 2009 मध्ये आमदार केलं.
  • दिगंबरराव बागल यांनी शरद पवारांच्या मंत्रिमंडळातही काम केलं होतं.
  • करमाळा विधानसभेला 2009 मध्ये माढा तालुक्यातील 36 गावे जोडली आणि या गावांनी उत्तम साथ दिली.
  • राष्ट्रवादीने 2014 च्या निवडणुकीत रश्मी बागल यांना उमेदवारी दिली. पण अवघ्या 253 मतांनी त्यांचा पराभव झाला.
  • सोलापूर जिल्हा बँकेच्या संचालिका म्हणून पक्षाने त्यांना बढती दिली.
  • सध्या रश्मी बागल यांच्याकडे मकाई आणि आदिनाथ सहकारी साखर कारखाने आणि करमाळा कृषी ऊत्पन्न बाजार समिती आहे. दिंगबरराव बागल यांची राजकीय वारस म्हणून त्या राजकारणात वावरत आहेत. रश्मी बागल या करमाळामधील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांपैकी एक मानल्या जातात.
  • आदिनाथ आणि मकाई या साखर कारखान्यांवर त्यांची सत्ता आहे.

 गावित कुटुंब शिवसेनेत

दरम्यान, गावित कुटुंबाने शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेना आणखी मजबूत झाल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

“निर्मला गावित यांनी कुटुंबासह शिवसेनेत प्रवेश केला. माणिकराव गावित हे काँग्रेसमधलं मोठं घराणं आहे. इंदिरा गांधी यांनी त्यांच्या कुटुंबावर प्रेम केलं होतं. आता निर्मला गावित शिवसेना पक्ष बांधणीसाठी पुढे काम करतील. उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेचे प्राबल्य आहेच, पण निर्मला गावित यांच्या येण्याने राहिलेली उणीव भरून निघेल”, असं उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.

कोण आहेत निर्मला गावित?

  • निर्मला गावित या काँग्रेसच्या विद्यमान आमदार आहेत
  • त्या नाशिकमधील इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात
  • 2009 आणि 2014 या दोन्ही विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला
  • 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता
  • 9 वेळा खासदार राहिलेले माणिकराव गावित यांच्या त्या कन्या आहेत.
  • निर्मला गावित यांनी काँग्रेसची विविध पदं भूषवली आहेत.

संबंधित बातम्या 

शरद पवारांनी लग्न लावून दिलेली तरुणी राष्ट्रवादी सोडणार   

नऊ वेळा काँग्रेस खासदार माणिकराव गावितांची कन्या शिवसेनेत, पुत्र भाजपच्या वाटेवर 

वडील 9 वेळा काँग्रेसचे खासदार, आता आमदार असलेली मुलगी शिवबंधन बांधणार?