OBC Reservation : केंद्र सरकार आपल्या कर्तव्याला चुकलं, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन जयंत पाटलांचा निशाणा

| Updated on: Jun 25, 2021 | 4:29 PM

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत ठराव करून मागणी सीबीआय चौकशीची मागणी करायची म्हणजे आरोपीने केलेल्या मागणीला पाठिंबा द्यायचा हे अनाकलनीय आहे. अत्यंत चुकीच्या पद्धतीने भाजपचं राजकारण सुरु आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केलीय.

OBC Reservation : केंद्र सरकार आपल्या कर्तव्याला चुकलं, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन जयंत पाटलांचा निशाणा
जयंत पाटील पत्रकार परिषद
Follow us on

उस्मानाबाद : मराठवाडा दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर जोरदार टीका केलीय. सन 2011 – 12 मध्ये आपण ग्रामविकास मंत्री असताना जे सर्वेक्षण केलं ते केंद्राकडे सुपूर्द करण्यात आलं होतं. ते सर्वेक्षण अधिकृतपणे जाहीर करायला हवं होतं. केंद्रसरकारकडे हे आकडे असताना ते सुप्रीम कोर्टात दिले नाहीत, म्हणून सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला. त्यामुळे केंद्र सरकार आपल्या कर्तव्याला चुकलं आहे असा आरोप जयंत पाटील यांनी केलाय. (Jayant Patil’s criticism of the central government and BJP on the issue of OBC reservation)

निवडणूक आयोगाने राज्य सरकारच्या गृहविभागाला, मुख्य सचिवांना कोरोनाची परिस्थिती किंवा साधारणपणे येणार्‍या पावसाचा अंदाज घेत माहिती देणं अपेक्षित होतं. परंतु त्यांनी तसं न करता निवडणूका जाहीर केल्या. याबाबत राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीतही चर्चा झाली. त्यामुळे राज्यातील ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द होणं यालाच आमचा विरोध आहे, असंही जयंत पाटील म्हणाले. ओबीसी आरक्षणाबाबत छगन भुजबळ यांनी काल पक्षाच्या बाजूची आणि राज्यातील ओबीसी समाजाची व्यथा मांडली आहे, असं पाटील म्हणाले.

ओबीसीचं राजकीय आरक्षण परत देण्याचा सरकारचा निर्धार

राज्यसरकारचा निर्धार आहे की, काही झालं तरी ओबीसी समाजाने जे राजकीय आरक्षण गमावलं आहे, विशेषतः 55 हजार राजकीय जागा गमावल्या आहेत, त्यात त्यांना राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिकाही जयंत पाटील यांनी मांडली. राज्यात मंडल आयोग आल्यानंतर ओबीसी समाजाला विशेषतः पवारसाहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाबाबत पावलं उचलली होती. त्याचा मान राखून सर्व समाजांना राजसत्तेत जाण्याची संधी मिळाली पाहिजे ही पक्षाची भूमिका आहे, असंही पाटील म्हणाले.

भाजप कार्यकारिणीतील ठरावावर जोरदार टीका

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत ठराव करून मागणी सीबीआय चौकशीची मागणी करायची म्हणजे आरोपीने केलेल्या मागणीला पाठिंबा द्यायचा हे अनाकलनीय आहे. अत्यंत चुकीच्या पद्धतीने भाजपचं राजकारण सुरु आहे. भाजपाला कुठलं कामच उरलेलं नाही. भाजपने कोरोनाबाबत, विकासाबाबत चर्चा केली पाहिजे, परंतु एका गुन्हेगाराने केलेल्या कथित आरोपाची चौकशी करण्याची मागणी करणे म्हणजे त्यांना देशातील सीबीआयसारख्या यंत्रणांचा गैरवापर करण्याची फारच सवय लागलेली दिसते, असा टोलाही पाटील यांनी भाजपाला लगावला.

देशमुखांवरील कारवाईवरुनही केंद्रावर निशाणा

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी पडलेल्या छाप्यावर बोलताना जयंत पाटील यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधलाय. सर्व एजन्सीचा वापर करुनही अनिल देशमुखांकडे काही सापडत नाही म्हटल्यावर त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार चेक करायचे. दहा वर्षापूर्वी काही झालं असेल त्यासंदर्भात गुन्हा दाखल करायचा आणि छापेमारी करायची हा आता सगळ्यांचाच अनुभव आहे, अशी टीका पाटील यांनी केलीय.

संबंधित बातम्या :

काल अजित पवारांविरोधात CBI चौकशीचा ठराव, आज अनिल देशमुखांवर ED चे छापे

निवडणुका रद्द करा, चंद्रशेखर बावनकुळेंचं निवेदन, निवडणूक आयुक्त म्हणाले, आता निवडणुका थांबणार नाहीत!

Jayant Patil’s criticism of the central government and BJP on the issue of OBC reservation