Article 370 : काश्मीर मुद्द्यावर बोलतानाचा बाळासाहेब ठाकरेंचा जुना व्हिडिओ वायरल

| Updated on: Aug 05, 2019 | 11:47 PM

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्या खास ठाकरे शैलीसाठी ओळखले जातात. त्यांच्या बेधडक बोलण्याच्या शैलीमुळेच ते महाराष्ट्राच्या राजकारणासोबतच राष्ट्रीय राजकारणातही नेहमीच चर्चेत राहिले. मात्र, आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कलम 370 हटवण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या लोकप्रियतेचा अनुभव येत आहे.

Article 370 : काश्मीर मुद्द्यावर बोलतानाचा बाळासाहेब ठाकरेंचा जुना व्हिडिओ वायरल
Follow us on

मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्या खास ठाकरे शैलीसाठी ओळखले जातात. त्यांच्या बेधडक बोलण्याच्या शैलीमुळेच ते महाराष्ट्राच्या राजकारणासोबतच राष्ट्रीय राजकारणातही नेहमीच चर्चेत राहिले. मात्र, आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कलम 370 हटवण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या लोकप्रियतेचा अनुभव येत आहे. सध्या सोशल मीडियावर बाळासाहेब ठाकरेंचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत बाळासाहेब ठाकरे काश्मीरबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना दिसत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील मुलाखतीत बाळासाहेबांना आपण पंतप्रधान होणार का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी तशी विशेष परिस्थिती तयार झाल्यास नक्कीच होईल, असं उत्तर दिलं. त्यानंतर मुलाखतकाराने त्यांना पंतप्रधान झाल्यावर कोणतं पहिलं काम करणार असाही प्रश्न विचारला होता. त्यावर बाळासाहेब ठाकरेंनी काश्मीर साफ करणार असल्याची प्रतिक्रिया दिली होती.


बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, “मी पंतप्रधान झाल्यावर पहिलं काम काश्मीर साफ करण्याचं करेल. काश्मीरमध्ये एकही पाकिस्तान, बांगलादेशचा नागरिक राहता कामा नये. दहशतवाद्यांवर खटला न चालवता थेट गोळीबार करण्याचा आदेश देईल.”

दरम्यान, कलम 370 (Article 370) हटवून काश्मीरचे विशेषाधिकार काढण्याच्या घोषणेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. “आज खरोखरच ऐतिहासिक दिवस आहे. इतकी वर्षे देशातील प्रत्येक माणूस जे स्वप्न उराशी बाळगून होता ते पूर्ण झालं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचंही स्वप्न आज पूर्ण झालं. त्यामुळे मी मनापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचं अभिनंदन करतो, असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं होतं.”

“पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचे कौतुक करताना आजही आपल्या देशात पोलादीपणा कायम आहे. हे संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. तसेच 15 ऑगस्ट हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. मात्र आज (5 ऑगस्ट) आपला देश पूर्ण स्वतंत्र झाला,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

इतकंच नव्हे तर जे विरोध करत असतील त्यांनी राजकीय जोडे बाजूला ठेवा. पण देशाच्या सार्वभौमत्वाच्या बाबतीत कुठेही तडजोड होणार नाही याची आपण सगळे मिळून दक्षता घेऊ. तसेच हा निर्णय एखाद्या राजकीय पक्षापुरता मर्यादित नसून तो देशाच्या एकसंघपणासाठी महत्वाचा निर्णय आहे. त्यामुळे सगळ्यांनी मिळून या निर्णयाचे स्वागत आहे.

कलम 370 (Article 370) हटवून काश्मीरचे विशेषाधिकारही काढल्याने शिवसेना आणि भाजपच्या वचननाम्यातील एक वचन पूर्ण झालं आहे. आज बाळासाहेब असते तर त्यांना याचा नक्कीच आनंद झाला असता. त्यामुळे सर्वांनी ही आनंदोत्सव साजरा केला पाहिजे.

-उद्धव  ठाकरे

“तसेच जे या अनुषंगाने आदळ आपट करतील त्यांना सरकार बघेल असाही इशारा त्यांनी विरोधकांना दिला. तसेच काश्मीर हा भारताचा अविभाज्य हिस्सा आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.”

शिवसैनिकांचा जल्लोष

कलम 370 (Article 370) हटवून काश्मीरचे विशेषाधिकारही काढल्यानंतर ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी शिवसेना भवन येथे फटाके फोडून जल्लोष साजरा केला. तसेच उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बर्फी वाटून साजरा केला. तसेच शिवसेना भवनाबाहेर ढोल वाजवून शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला.