विरोधी पक्षांच्या मारक शक्तीमुळे भाजपने ज्येष्ठ नेते गमावले, प्रज्ञासिंह ठाकूर पुन्हा बरळल्या

| Updated on: Aug 26, 2019 | 3:07 PM

सध्या वाईट काळ सुरु आहे, विरोधी पक्ष मारक शक्तीचा प्रयोग तुमच्या पक्षावर आणि नेत्यांवर करत आहेत. त्यामुळे सावध रहा, असं एका महाराजांनी आपल्याला सांगितल्याचा दावा भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला.

विरोधी पक्षांच्या मारक शक्तीमुळे भाजपने ज्येष्ठ नेते गमावले, प्रज्ञासिंह ठाकूर पुन्हा बरळल्या
Follow us on

भोपाळ : भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा बेताल वक्तव्य करुन खळबळ उडवून दिली आहे. विरोधी पक्ष मारक शक्तीचा प्रयोग करत आहेत, त्यामुळेच भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना प्राण गमवावे लागले आहेत, असा आरोप प्रज्ञा ठाकूर यांनी केला आहे. भाजप नेते विरोधकांच्या निशाण्यावर असल्याचं एका महाराजांनी मला सांगितलं होतं, असा दावा त्यांनी केला.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये भाजप कार्यालयात माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बाबूलाल गौर यांच्यासाठी श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी भोपाळच्या खासदार प्रज्ञा ठाकूर भाजप नेत्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना विरोधी पक्षांवर घसरल्या.

मी जेव्हा निवडणूक लढवत होते, त्यावेळी एक महाराज आले होते. त्यांनी मला सांगितलं, तुम्ही तुमची साधना कमी करु नका, साधनेची वेळ वाढवा. कारण सध्या वाईट काळ सुरु आहे, विरोधी पक्ष मारक शक्तीचा प्रयोग तुमच्या पक्षावर आणि नेत्यांवर करत आहेत. त्यामुळे सावध रहा, असं त्यांनी सांगितल्याचा दावा साध्वींनी केला.

त्या महाराजांनी सांगितलेल्या गोष्टीचा मला विसर पडला होता. मात्र मी सुषमा स्वराज, बाबूलाल गौर, अरुण जेटली यासारखे आपल्या पक्षाचे नेते वेदना सहन करत एकापाठोपाठ एक आपल्याला सोडून जात आहेत. त्यामुळे महाराजांनी सांगितलेलं खरं आहे, असं मला वाटायला लागलं आहे, असंही प्रज्ञा सिंह म्हणाल्या.

बेताल वक्तव्यांची मालिका

मला खोट्या खटल्यात फसवलेल्या हेमंत करकरेंना दहशतवाद्यांनी मारुन माझं सुतक संपवलं, असं चीड आणणारं वक्तव्य साध्वी प्रज्ञा यांनी केलं होतं.

“तपास अधिकारी सुरक्षा समितीचा सदस्य होता. त्याने हेमंत करकरेंना बोलवून मला सोडण्यास सांगितलं होतं. मात्र हेमंत करकरेंनी नकार देत, मी काहीही करुन पुरावे आणेन, पण साध्वीला सोडणार नाही असं म्हटलं होतं” असं साध्वी बोलल्या होत्या.

हेमंत करकरेंची ही कूटनीती होती, देशद्रोह होता, धर्मविरोध होता. ते मला विचारत होते मला सत्यासाठी देवाकडे जावं लागेल का, तेव्हा मी त्यांना म्हणाले तुम्हाला वाटत असेल तर जा, असं साध्वीने सांगितलं.

साध्वी प्रज्ञाने शहीद हेमंत करकरेंची तुलना कंसाशी केली. कंसाचा वध जसा श्रीकृष्णाने केला, तसंच देवाने वध केला, असं साध्वी म्हणाली.

गोडसे देशभक्त असल्याचा दावा

महात्मा गांधींचा हत्यारा नथुराम गोडसे देशभक्त होता, आहे आणि राहील असं म्हटलं होतं. त्यांना दहशतवादी म्हणणाऱ्या व्यक्तींनी आधी स्वतःकडे पाहावं, असं त्या अभिनेते कमल हासन यांना उद्देशून म्हणाल्या होत्या.

संबंधित बातम्या 

भाजपकडून वाचाळवीरांची दखल, अखेर अमित शाह बोलले!   

साध्वी प्रज्ञा ठाकूरकडून नथुराम गोडसेचं समर्थन     

Video: नथुराम गोडसे देशभक्त होते, आहेत आणि राहतील : प्रज्ञा ठाकूर